दातली(जि. नाशिक) : तालुक्यातील गोंदे येथील ११ वर्षीय शाळकरी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. समृध्दी महामार्गालगत बेंद मळा येथे रवींद्र तुळशीराम तांबे यांची वस्ती आहे. रवींद्र तांबे यांच्यासह ११ वर्षीय मुलगा प्रफुल्ल (भैया) हा गुरुवारी (दि. 5) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घराच्या ओट्यावर उभा राहून लघुशंका करत होता. लघुशंका झाल्यानंतर तो घरात जाण्यासाठी निघाला असताना शेजारीच असणाऱ्या मकाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप घालून त्यावर हल्ला केला व त्यास ओढून नेले.
रवींद्र तांबे घरात जात असतानाच हा प्रकार घडल्याने त्यांनी आरडाओरडा करत शेजारील नागरिकांना आवाज देऊन जागे केले. शेजाऱ्यांनी लाठ्याकाठ्या व बॅटरी घेऊन त्याचा शोध घेतला. दरम्यान पंधरा मिनिटांनी मकाच्या शेतात घरापासून ३०० मीटर अंतरावर प्रफुल्ल जखमी अवस्थेत आढळून आला. त्यास सिन्नर येथे उपचारासाठी नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रफुल याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले असून सदर मुलावर बिबट्याने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पाच दिवसांपूर्वी दातली येथील सोमनाथ भागूजी भाबड यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करत गाय ठार केली. त्यामुळे याच्यावर बिबट्यानेच हल्ला करुन त्यांना ठार केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याआधी पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत होते आता मात्र मुलावर हल्ला झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. खंबाळे परिसरात वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने वनविभागाचे कर्मचारीच दुसरीकडे पकडलेले बिबटे या क्षेत्रात आणून सोडत आसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.