नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गत पंधरवड्यात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये व व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत शहरातील जलमय भागांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह नंदिनी नदी व काझी गढी परिसरात संरक्षक भिंतीच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
निवेदनात आमदार फरांदे यांनी, शहरातील विद्यमान पावसाळी गटार योजनेचे पुनर्मूल्यांकन करून त्यातील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेले नसतानाही शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे निचरा व्यवस्थेतील उणिवा स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे जलमय होणाऱ्या सर्व भागांचे तातडीने सर्वेक्षण करीत कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यात याव्यात आणि त्यासाठी राज्य शासनाने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यामुळे शहराची पावसाळी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या दूर झाल्यास नागरिकांसह भाविकांनाही मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
गोदावरी नदीलगतच्या काझी गढी परिसरातही मातीची धूप सुरू असून, परिसर धोकादायक होत असल्याचे निदर्शनास आणून देत, या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याबाबत पूर्वी आश्वासन देण्यात आले असले, तरी अद्याप कामाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आवश्यक निधी तत्काळ मंजूर करून संबंधित विभागाला काम सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.