नाशिक : पंचवटीतील कालिकानगर येथे २०१८ मध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी जलालउद्दीन अलीमोहम्मद मलिक याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. भन्साळी यांनी गुरुवारी (दि.१४) हा निकाल दिला. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. पंचवटीतील मायको दवाखान्याजवळ ६ ऑगस्ट २०१८ ला पहाटे ही घटना घडली होती. फिर्यादी संगीता सुरेश देवरे (३८) यांच्या घरात आरोपी जलालउद्दीन मलिक हा राहत होता.
घरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने 'मै यहाँसे जाऊंगा नही, जाऊंगा तो तुझे और तेरे परिवार को जिंदा जलाके मारके ही जाऊंगा' अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने पेट्रोलपंपावरून डिझेल आणून संगीता देवरे त्यांची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (२०) आणि नात सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) या झोपेत असताना त्यांच्या अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळले. या घटनेत तिघींचाही मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ, व्ही. डी. शार्दुल आणि पोनि. विजय ढमाळ यांनी केला. त्यांनी आरोपीविरोधात पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे लिना चव्हाण आणि अनिल बागले यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, मधुकर पिंगळे, मनोहर खंबाईत, विक्रांत नागरे, रशिद शेख आणि तनजीम खान यांनीही पाठपुरावा केला.