नाशिक : एकीकडे नाशिकच्या ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या हवाईसेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे एकापाठोपाठ एक सेवा बंद होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत धावपट्ट्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कारण सांगत तीन शहरांच्या सेवा बंद केल्या असून, आता १ ऑगस्टपासून नाशिक-इंदूर थेट विमानसेवा बंद केली जाणार असल्याने संख्या चारवर जाणार आहे.
सध्या इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून नवी दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तेथून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाही उपलब्ध आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत असून, दिवसेंदिवस प्रवाशांत वाढ होत आहे. सन २०२३-२४ मध्ये (एप्रिल ते मार्च) ओझर विमानतळावरून दोन लाख ४२ हजार ३७२ जणांनी प्रवास केला होता. त्यात सन २०२४-२५ मध्ये ४०.७ टक्क्यांनी वाढ होऊन तीन लाख ४१ हजार ११२ जणांनी प्रवास केला.
म्हणजे वर्षभरात ९८ हजार ७४० प्रवासी वाढले. ओझर येथून सध्या दररोज आठशे ते हजार जण प्रवास करीत आहेत. तथापि, विमानसेवेत सातत्य राहत नसल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. मागील तीन महिन्यांत जयपूर, नागपूरची सेवा बंद झाली आहे, तर नवी दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-नवी दिल्ली सेवेचे पंख छाटण्यात आले आहेत. आता इंदूर विमानसेवेवर गंडांतर आले आहे. येत्या १ ऑगस्टपासून ही सेवा बंद होत असल्याने कंपनीकडून बुकिंग थांबवण्यात आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थानला जोडणारी ही सेवा बंद झाल्याने उद्योजक, पर्यटक, भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे.
जयपूर : दोन महिन्यांपासून खंडित सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू झाली; पण दोन महिन्यांतच बंद पडली.
नागपूर : उन्हाळी वेळापत्रकात समावेश नसल्याने ३० मार्चपासून बंद.
नवी दिल्ली : धावपट्टीच्या कामामुळे १ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस सेवा सुरू.
१५ जून ते १५ सप्टेंबर हा विमानसेवेसाठी 'लीन पीरियड' (अल्प प्रतिसादाचा) असतो. या काळात धावपट्ट्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. १५ सप्टेंबरनंतर सर्व सेवा पूर्ववत होतील. नाशिकमध्ये प्रवाशांचा तुटवडा नाही.मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा, नाशिक