

नाशिक : सतीश डोंगरे
अहमदाबादहून लंडनला टेक ऑफ करणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७ या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला. हा अपघात इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जात असून, एअर इंडियाबरोबरच इतर एअरलान्स कंपन्यांसाठीही हा अपघात मोठा हादरा देणारा ठरला आहे. या अपघाताने देशातील सर्वच एअरलाइन्स कंपन्यांची घडी विस्कटली असून, नाशिकच्या विमानतळावरून सुरू असलेल्या 'इंडिगो'च्या सेवेलाही काही अंशी हादरा देणारा ठरत आहे.
एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमान अपघातानंतर विमानाने प्रवास करणे किती सुरक्षित? असा विचार पुढे आल्यामुळे, त्याचा परिणाम सर्वच एअरलाइन्सच्या प्रवासी संख्येवर होताना दिसत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि गोवा या पाच शहरांना जोडणारी विमानसेवा दिली जात असून, अपघातानंतर या सर्वच शहरांच्या प्रवासी संख्येवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७ जून रोजी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विमानतळाच्या इतिहासातील सर्वोच्च १,३३४ इतकी प्रवासी संख्या नोंदविली गेली होती. अपघातानंतर मात्र ही संख्या निम्म्यावर आली आहे. भीतीपोटी अनेक जण विमान प्रवासाला नकार देत असल्यानेच, संख्या सातत्याने कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
तारीख - प्रवासी संख्या
१३ जून - १,१५३
१४ जून - १,२७१
१५ जून - ८,३९
१६ जून - ७२६
१७ जून - १,१९७
१८ जून - ६०९
१९ जून - १,०६०
२० जून - ७४९
त्यातच अपघातानंतर समाजमाध्यमांवर अनेक अफवा पसरत असल्यामुळे त्याचाही फटका प्रवासी संख्येला बसत आहे. अपघाताअगोदर ज्यांनी तिकीट बुकिंग केले, त्यांच्यातील अनेकांकडून बुकिंग रद्द केल्याचीही माहिती समोर येत आहे, तर रेल्वेचे एसी बुकिंग अचानक वाढल्याचे समोर येत आहे. दरम्यान, विमान प्रवास हा पूर्णपणे सुरक्षित असून, प्रवाशांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एअरलाइन्स कंपन्यांकडून केले जात आहे.
विमान अपघाताचा सर्वच एअरलाइन्स कंपन्यांच्या प्रवासी संख्येवर काही अंशी परिणाम झाला आहे. नाशिक- दिल्ली विमानसेवा आठवड्यातून चारच दिवस केल्यानेही नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्या घटली आहे. मात्र, विमान प्रवास सुरक्षित असून, कंपन्यांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा, नाशिक.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून सर्वाधिक दररोज उड्डाण घेणारी नाशिक- दिल्ली विमानसेवा मागील काही दिवसांपासून आठवड्यात चारच दिवस सुरू आहे. दिल्ली येथील विमानतळावर धावपट्टीचे काम सुरू असल्याने, याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाही परिणाम प्रवासी संख्येवर होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे चारच दिवस ही सेवा सुरू आहे. लवकरच दररोज सेवा सुरू केली जाणार असल्याचीही माहिती पुढे येत आहे.