नाशिक : जिल्ह्यात सप्टेंबरचा मध्य गाठण्यापूर्वीच ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शहर परिसरासह जिल्ह्यात रात्री आणि पहाटेच्या सुमारास जाणवणारा गारवा, तर दुपारनंतर अचानक वाढणारे ऊन यामुळे दिवसाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत.
या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही जाणवत असून, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी तसेच थकवा यांसारख्या आजारांच्या तक्रारीही वाढल्या असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्यामुळे शेतीपिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, जुलै महिन्यातील पावासामुळे उपलब्ध ओलाव्यावर तग धरलेल्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील सुमारे निम्मा भाग दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांमध्ये जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, हवामान विभागाचा अंदाज प्रत्यक्षात किती उतरतो आणि जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस होतो, यावर शेतीची पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचेही आता आभाळाकडे लक्ष लागले आहे.
शहर परिसरात आज येलो, उद्या ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने नाशिक शहर परिसर आणि घाट परिसरात शनिवारी (दि. १२) यलो अलर्ट जाहीर केला असून, रविवारी (दि. १३) घाट माथा परिसरात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या कालावधीत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. यात नाशिक शहर, परिसरात पहिल्या दिवशी हलका ते मध्यम पाऊस, तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, घाट परिसरात पहिल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, तर तिसऱ्या दिवशी अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा दिला आहे.