Nashik guardian minister Issues
नाशिक : सगळं काही होईल, शेतकऱ्यांना मदत मिळेल, लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील, पण दिवाळीपूर्वी नाशिकचा पालकमंत्री जाहीर होणार नाही,’’ अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ‘युवा रंग’ या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.
पालकमंत्री पदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर महाजन म्हणाले, ‘‘नाही, बाकी सगळं होईल, पण पालकमंत्री पदाबाबत काही सांगता येत नाही,’’ असे स्पष्टपणे नमूद करत त्यांनी आपली नाराजीही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.
सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल ते म्हणाले, ‘‘हे अपेक्षेपेक्षा चांगले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सामना आणि उबाठा यांनी चिंता करू नये; सरकार योग्य निर्णय घेत आहे.’’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘‘कर्जमुक्तीबाबतही सरकार लवकरच निर्णय घेईल.’’
भ्रष्टाचारविषयक चर्चेला उत्तर देताना महाजन म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोचे अहवाल सांगतात, पण हे सरकार कारवाई करत आहे. आकडे वाढले म्हणजे राज्य भ्रष्टाचारी झाले असे नाही, कारवाई होत आहे हे महत्त्वाचे आहे.’’
नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘‘हो, नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मुख्यमंत्री स्वतः पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था टिकवणे हे सरकारचे प्राधान्य आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात महाजन म्हणाले, ‘‘काही विभागातील निधी तात्पुरता वळवला असेल, पण सर्वांना दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल. कोणाच्याही खात्यात पैसे थांबणार नाहीत.’’
जिल्हाधिकारी बदलाबद्दल विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘अधिकारी अधिकारी असतात. जळगावचे नवे जिल्हाधिकारी माझ्या मर्जीतले नाहीत असं म्हणणं योग्य नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्याने बदली झाली आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.