Girish Mahajan News File Photo
नाशिक

Girish Mahajan | एसटीपी प्रकल्पाचे चार महिन्यांत काम पूर्ण होणार : महाजन

Girish Mahajan | एसटीपी प्रकल्पाचे चार महिन्यांत काम पूर्ण होणार; गोदावरी जलप्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार - कुंभमेळामंत्री गिरीश महाजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरी नदीत सध्या मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येत असलेला एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प पुढील चार महिन्यांत पूर्ण होणार असून, त्यामुळे गोदावरी जलप्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाशिक येथे कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गोदावरीतील प्रदूषणाविषयी भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविण्यात येत आहे.

सध्या शहरातील मोठ्या प्रमाणातील सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याने गंभीर बनलेला नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पुढील चार महिन्यांत या कामाची पूर्तता करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पर्यावरणीय निकषांचे पालन करून पुन्हा गोदावरी नदीत सोडण्यात येणार असल्याने नदीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक स्वच्छ व निर्मळ गोदावरी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT