नाशिकरोड : लखनौ-मुंबई दरम्यान धावणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या एम-१ कोचमधून चालत्या गाडीतून कचरा फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे 'स्वच्छ भारत' अभियानाचे संदेश देत असताना दुसरीकडे रेल्वेगाड्यांमधून थेट ट्रॅकच्या बाजूला कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणासह ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील कचरा चालत्या गाडीतूनच बाहेर फेकला जातो. यामध्ये अन्नपदार्थांचे अवशेष, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल प्लेट्स तसेच ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात असतो. हा कचरा रेल्वे ट्रॅकलगतच्या वस्त्या, शेती आणि गावांमध्ये जाऊन पडत असल्याने दुर्गंधी पसरत असून, प्रदूषणात वाढ होत आहे.
रेल्वे ट्रॅकशेजारील शेतांमध्ये प्लास्टिकचा कचरा मिसळल्याने जमिनीची सुपीकता कमी होत असून, पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. अनेक वेळा नद्या, नाले आणि ओढ्यांवरून रेल्वे जात असताना देखील कचरा फेकला जात असल्याने जलप्रदूषणाचा धोकाही वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत' अभियानाद्वारे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचवला. मात्र, रेल्वे विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या अभियानालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.