नाशिक : त्रंबक रोड येथील पिटीसी समोरील जागा सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ संदर्भातील महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वप्निल कृष्णा आहिरे (वय ४१), सहाय्यक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, नाशिक यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सन २००३ पासून आजपर्यंतच्या कालावधीत तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर येथून सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ या मिळकतींशी संबंधित संचिका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक यांच्या दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशान्वये सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार, नाशिक यांनी दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे फिर्याद दाखल करण्यास प्राधिकृत केले.यानंतर भा. न्या. संहिता कलम ३०५ (इ) प्रमाणे गुन्हा क्रमांक ४६/२०२६ दाखल करण्यात आला असून प्रथमहकबरी अहवाल न्यायालयात पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुन्हे शाखा युनिट-१, नाशिक शहर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रकरणातील कागदपत्रे गायब होण्यामागील नेमके कारण व जबाबदार व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. याबाबत सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्निल कृष्णा आहिरे यांनी फिर्याद दिली आहे. दिगंबर त्रिलोकचंद आहिरवार (रा. त्र्यंबकरोड, नाशिक) यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०१५ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज दाखल करून संबंधित टेनन्सी केसेसच्या निर्णयाची प्रत, कब्जा पावती व मंडळ अधिकाऱ्यांच्या आदेशाची नक्कल मागितली होती.
तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित संचिकांचा शोध सुरू असल्याचे कळविले होते. त्यानंतर अर्जदाराने प्रथम व द्वितीय अपील दाखल केले. राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक यांनी २०१८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार अभिलेखांचा कसून शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर अनेक वेळा शोध पथके नेमण्यात आली. संबंधित काळातील कुळकायदा लिपीक दिलीप वामन यांच्याकडूनही खुलासे मागविण्यात आले. त्यांच्या निवेदनानुसार संचिका वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचा उल्लेख आहे; मात्र निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार त्या संचिका तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वारंवार पत्रव्यवहार, नोंदवही तपासणी व शोध मोहिमेनंतरही संबंधित संचिकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. नोंदीवरील स्वाक्षऱ्या असलेले अधिकारी निधन पावल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे संचिका उद्देशपूर्वक लपविणे अथवा चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राज्य माहिती आयुक्त यांच्या दि. १२ ऑगस्ट २०२५ च्या आदेशान्वये आणि तहसीलदार, नाशिक यांच्या प्राधिकृत पत्रानुसार अखेर अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असून, बेपत्ता अभिलेखांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.