नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जून महिना उलटण्याच्या मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून, येवला तालुक्याला सर्वाधिक झळ बसली आहे. येवला तालुक्यातील ११४ गावे व वाड्यांना तब्बल ४४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
प्रशासनाकडून सुमारे ८० ते २० फेऱ्या मारून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाअभावी अनेक गावांमधील विहिरी, बोअरवेल व अन्य पाणीस्रोत आटल्यामुळे टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सध्या जिल्ह्यातील ६८१ गावे व वाड्यांमध्ये १९० टँकरच्या माध्यमातून दररोज सुमारे ४०० फेऱ्या मारून ३ लाख ३३ हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. येवलापाठोपाठ नांदगाव तालुक्यात पाणीटंचाई तीव्र झाली असून, येथे २३० गावे व वाड्यांमध्ये ३६ टँकरद्वारे पाणी पोहोचविले जात आहे.
मालेगाव तालुक्यात ६५ गावे व वाड्यांना १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबक, सुरगाणा आदी तालुक्यांमध्येही काही भागांत टँकरची गरज भासत असताना नाशिक व निफाड तालुक्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नसल्याचे शासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शेतकरीही पावसाअभावी चिंतेत असून, खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे.