नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिमझिम सरींमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून, प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. जिल्ह्यातील एकूण धरणसाठा ४९.१५ टक्क्यांवर पोहोचला असून, गंगापूर धरणात ७५ टक्के, दारणा धरणात ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तर भावली धरण शंभर टक्के भरल्याने जलसाठ्याची स्थिती समाधानकारक बनली आहे. तुलनेत नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे मुकणे धरण ३३.६५ टक्केच भरले असले तरी आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि. २१) जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण २६ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४९.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती कमी असली तरी जिल्ह्यातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता काही अंशी मिटली आहे.
गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये सध्या ६९.१४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामध्ये नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणात ७५ टक्के पाणीसाठा झाला असून, भावली मध्यम प्रकल्प १०० टक्के पूर्ण भरला आहे. तसेच वाघाड २४.८०, मुकणे ३३.६५ आणि दारणा धरणात ६६.१४ टक्के साठा उपलब्ध आहे.
तर पालखेड धरणसमूहात एकूण ३५.७२ टक्के साठा आहे. या अंतर्गत करंजवण धरण २८.७५ टक्के, तर वाकी धरण २५.३२ टक्के भरले आहे. ओझरखेड धरणात ३५.५४ टक्के साठा नोंदवला गेला आहे. गिरणा खोऱ्यातील धरणांत सरासरी ४३.९६ टक्के साठा झाला असून, मुख्य गिरणा धरणात ४०.२७ टक्के, तर हरणबारी ८२.३३ व केळझर धरण ७१.५० टक्क्यांवर पोहोचले आहे. चणकापूर धरणात ५४.३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
जिल्ह्यातील ७ मोठ्या प्रकल्पांची एकूण उपयुक्त क्षमता ४८,००४ दशलक्ष घनफूट असून, मध्यम स्वरूपाच्या १९ प्रकल्पांची क्षमता २२,६१५ दलघफू आहे. आजच्या घडीला २६ प्रकल्पांमध्ये एकूण ३४,७०८ दलघफू उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या मान्सूनवर अल निनोचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे अनियमित पावसाची शक्यता लक्षात घेऊन सध्या कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र, अल्प प्रमाणात का होईना पाण्याची आवक सातत्याने सुरू असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत धरणांमधून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.