इंदिरानगर : जुन्या भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने सराईत गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला चढवत त्याचा खून केल्याची घटना पाथर्डी गावात घडली. रविवारी (दि. २२) रात्री साडेनऊ ते दहाच्या काजी मंजिल इमारतीसमोर हे थरारनाट्य घडले.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे (२०, रा. विल्होळी, नाशिक) याच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शशिकांत गांगुर्डे (२६, रा. संघर्षनगर, नाशिक) याच्या फिर्यादीवरून, संशयित यश ऊर्फ आयुष दोंदे, प्रफुल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे, करण बावळ यांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागील मूळ कारण समजू शकले नाही. यानिमित्ताने शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा वचक न राहिल्याने भरवस्तीत रक्तरंजित थरारनाट्य घडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुन्हा घडल्यानंतर केवळ तपासाची पोलिसिंग नव्हे ,तर गुन्हेगारांना कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याची हिंमत होऊ नये, अशी जरब निर्माण होण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, या उलट चित्र पाहायला मिळत आहे. शहरात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. पूर्वी लपून-छपून केले जाणारे धंदे आजघडीला बिनधास्त सुरू होत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खाकीची प्रतिमा डागाळत चालली आहे.