नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहरातील व्यापारी राजेशकुमार गुप्ता यांचे अपहरण करून त्यांना मध्य प्रदेशात घेऊन जात २० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी शिताफीने शिर्डी येथून अटक केली आहे. गुन्हा उघडकीस आल्यापासून मुख्य सूत्रधार फरार होता. पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले आहे.
राजेशकुमार गुप्ता (रा. म्हसरूळ) यांचे ४ मार्च २०२४ रोजी म्हसरूळ हद्दीतील सुयोजित गार्डन येथून संशयितांनी अपहरण केले होते. याप्रकरणी संशयितांनी १२ लाखांची खंडणी वसूल केल्यानंतर गुप्ता यांना मध्य प्रदेशातील देवास येथे सोडून दिले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने यापूर्वीच तिघांना अटक केली आहे. परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. विशेष शाखेचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, अंमलदार भगवान जाधव, भूषण सोनवणे हे गस्तीवर असताना त्यांना या गुन्ह्यातील दोन संशयित शिर्डीत आले असल्याची खबर मिळाली होती. याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांना दिली. त्यानंतर मिटके यांच्यासह पथकाने शिर्डी गाठली. तसेच संशयितांचा शोध सुरू केला. त्यावेळी संशयित हे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे थांबल्याची माहिती मिळाली होती. शिर्डी पोलिसांच्या मदतीने शहर विशेष शाखेने संशयित शिव रवींद्र नेरकर उर्फ चिक्कू (२३, रा. नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको) व शुभम नानासाहेब खरात (२५, रा. संतोषी मातानगर, सातपूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. मुख्य सूत्रधार संशयित शिव नेहरकर हा गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता. त्यानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता. दरम्यान, संशयितांना तपासकामी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संदीप मिटके, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप भोई, किशोर रोकडे, दत्ता चकोर, रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, भगवान जाधव, अनिरुद्ध येवले यांच्या पथकाने बजावली.
हेही वाचा: