नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय आश्रमशाळेला भूस्खलनाचा संभाव्य धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (दि. ९) आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच आवश्यक असल्यास या कामांचा जिल्हा नियोजन आराखड्यात समावेश करून निधी उपलब्ध करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, शैक्षणिक सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सेवांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व गरजा जाणून घेतल्या.
आश्रमशाळेतील पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. यावेळी परिसरातील डोंगरउतार, पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि भूस्खलनाचा संभाव्य धोका याबाबतही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कामे हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील नीलपर्वत परिसरही भूस्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, तसेच पावसाळ्यात सतर्कता वाढविण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
जिल्हा प्रशासनाने भूस्खलनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यास सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संवेदनशील भागांतील नागरिकांचे संरक्षण हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक