नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक परिक्रमा मार्गासह इतर रस्त्यांच्या कामांत सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखत गती द्यावी. हा मार्ग सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मंगळवारी (दि. 23) नाशिक परिक्रमा मार्गासह इतर रस्ते कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक ब्रिजेश दीक्षित, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (भूसंपादन), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे हे दूरदृश्य संवाद प्रणाली माध्यमातून सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक परिक्रमा मार्ग शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे नाशिक परिसर विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम कुंभमेळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. या मार्गाच्या प्रस्तावित मोजणीसह आवश्यक कामांसाठी मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून घ्यावी. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या प्रकल्पासह इतर रस्ते कामांचे भूसंपादन व मोजणीचे सूक्ष्म नियोजन करून चिन्हांकनाचे काम तातडीने पूर्ण करावे. एकीकडे जमीन मोजणीची कार्यवाही सुरू असताना, दुसरीकडे भूसंपादन विभागाने कृषी, वन विभाग यांच्याशी समन्वय साधून आपली कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मार्गासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यात नियमाप्रमाणे भरीव भरपाई देण्यात येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना राज्य शासनाची भूमिका समजावून सांगावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक दीक्षित यांनी परिक्रमा मार्गाच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.