नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार दि. ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनीही बूथ लेव्हल असिस्टंटची नियुक्त्ती करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. २७) बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतून मतदार यादीतील दुबार, मृत आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळणे,
बोगस मतदारांची नावे वगळणे, मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे, अपात्र किंवा परदेशी नागरिकांचा समावेश रोखणे, नवीन आणि पात्र मतदारांचा समावेश करणे, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा मूळ उद्देश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
मतदाराचा पत्ता अपूर्ण असल्यास, मतदार आढळून न आल्यास त्या भागातील बीएलए यांच्या मदतीने शोध घेणे व सापडल्यास वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच मतदार न सापडल्यास तसा पंचनामा करून त्या मतदाराचे नाव वगळण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.
बीएलओ मतदारांना देणार दोन अर्ज प्रत
या मोहिमेत बीएलओ प्रत्येक मतदाराला प्रगणना अर्ज दोन प्रर्तीत वाटप करतील. त्यासाठी आवश्यक अर्जाचे मुद्रण पूर्णत्वास आले आहे. दुसऱ्या भेटीवेळी मतदाराने भरलेला प्रगणना अर्ज जमा करण्यात येऊन एक प्रत मतदाराला देण्यात येईल. मतदाराचे घर बंद असल्यास अर्ज दोन प्रतींत त्याच्या घरात सरकविण्यात येतील.
नंतर जमा करण्यास तीन वेळेस भेट देऊन जमा न झाल्यास तसा पंचनामा करण्यात येईल. मतदार स्थलांतरित झाला असल्यास, आजूबाजूच्या लोकांचा तसा जबाब घेऊन पंचनामा करण्यात येईल. अशा मतदारांचा अर्ज क्रमांक ७ भरून मतदार स्थलांतरित झाल्यामुळे संबंधित यादी भागात त्याचे नाव हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.