नाशिक : धनराज माळी
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे चार वर्षांत १,३४८ तक्रारी आल्या असून, त्यापैकी ९५ टक्के तक्रारी निकाली निघाल्या आहेत. त्यातून तक्रारदारांचे समाधान झाले आहे. केवळ पाच टक्के तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामागेही तांत्रित अडचणी असल्याने प्रलंबित राहिल्या आहेत.
जिल्हास्तरावर सुरू असलेल्या या कक्षामुळे तक्रारदारांची मुंबई वारी टळली आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नांविषयी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यासाठी नागरिकांना थेट मुंबई गाठावी लागत होती.
त्यातून पैसा व वेळ खर्ची होत होता. त्यामुळे अनेक जण तक्रारी करणे टाळत होते. स्थानिक स्तरावर अधिकारींपर्यंत तक्रारी करून जर दाद नाहीं मिळाली तर तक्रारदार गप्प बसत असत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य माणसालाही मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करता यावी, त्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण व्हावे, नागरिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू केले आहे.
त्याचे काम तुषार शेरकर काम पाहात आहेत. जेणेकरून नागरिकांना स्थानिक स्तरावर तक्रार दाखल करून ती थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचविण्याचा सुलभ मार्ग मिळाला. त्यामुळे महसूल, शेती यासह विविध मूलभूत सुविधांविषयीच्याही तक्रारी नागरिक आता थेट मुख्यमंत्री तक्रार कक्षाकडे करू लागले आहेत.
त्यामुळे तक्रारींचे निकाली निघून तक्रारदारांना न्याय देण्याचे काम या कक्षामार्फत सुरू आहे. गेल्या चार वर्षांत म्हणजेच २०२३ ते २०२६ पर्यंत विविध विभागाच्या १,३४८ तक्रारी या कक्षाकडे आल्या आहेत. त्यापैकी २०२३ व २०२४ या दोन वर्षांत १०० टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत, तर उर्वरित दोन वर्षात केवळ ५ टक्के तक्रार अर्ज प्रलंबित आहेत, हे विभागाचे मोठे यश आहे.