नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंद अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत सहा फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सुरू आहे. तपास अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, खरातवर अत्याचार करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत असून, विविध ठिकाणांहून तक्रारी दाखल होत आहेत. तपासाची व्याप्ती वाढत असल्याने पोलिसांना अधिकाधिक माहितीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे या गुन्ह्यांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती आहे, त्यांनी ती तत्काळ एसआयटी पथकाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोंदू अशोक खरात महिला प्रकरणाचा तपास अधिक काटेकोर, सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत पोलिस मुख्यालयातील हिमांशू बंगल्यामधून सुरू असलेला तपासाचा कारभार आता महाराष्ट्र पोलिस अकादमी, त्र्यंबक रोड येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तपास प्रक्रियेला अधिक संरक्षण मिळणार असून, संवेदनशील माहिती बाहेर जाण्याचा धोका कमी होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हिमांशू बंगला परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. माध्यम प्रतिनिधी, ये-जा करणारे नागरिक तसेच इतर घटकांमुळे गोपनीयतेचा भंग होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि मर्यादित प्रवेश असलेले ठिकाण निवडणे आवश्यक बनले होते.
याच पार्श्वभूमीवर एसआयटीने त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीची निवड केली. या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था कडक असून, बाहेरील व्यक्तींना सहज प्रवेश मिळत नाही. त्यामुळे तपासाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवणे शक्य होत आहे.
विशेषतः या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख गुप्त राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने हा निर्णय निर्णायक ठरला आहे. चौकशीदरम्यान पीडित महिलांना अकादमी परिसरातच गुप्तपणे बोलावण्यात येत असून, त्यांच्या येण्या-जाण्याची माहिती अत्यंत मर्यादित अधिकाऱ्यांनाच दिली जात आहे.
त्यामुळे त्यांच्या ओळखीचा उलगडा होण्याचा धोका टाळण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे पीडित महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, अधिक महिला पुढे येऊन तक्रारी नोंदवण्याची शक्यता वाढत आहे. एकूणच, एसआयटीने घेतलेला हा निर्णय तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, प्रकरणातील गुंतागुंतीचे धागेदोरे अधिक वेगाने उलगडण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या क्रमांकावर साधा संपर्क
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, महिला पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली माहिती एसआयटी पथकाच्या ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ या मोबाइल क्रमांकांवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.