नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात १२ दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना कॉक्रॉच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेऊन आंदोलन अधिक व्यापक करावे. सकल आदिवासींचा मोर्चा थेट मुंबईला घेऊन जाऊ.
तिथून त्यांना तुमचा आवाज ऐकला जाईल. सर्व मिळून आदिवासी विकासमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू, असा इशारा दीपके यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनातील एक विद्यार्थी अत्यवस्थ झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी (दि. ३) दीपके यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी वसतिगृहांमधील असुविधा, निकृष्ट दर्जाचे भोजन, सेंट्रल किचन बंद करण्याचा निर्णय तसेच डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक लूट याबाबत संताप व्यक्त केला. आश्रमशाळांच्या शौचालयांची दुरवस्था, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यावरही आंदोलकांनी दीपके यांचे लक्ष वेधले.
गत दोन वर्षांत ५९० विद्यार्थ्यांचा वसतिगृहात मृत्यू झाला. त्याची चौकशी व्हायला हवी. मंत्री उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले आणि हसत हसत गाडीत बसून निघून गेले. तुमच्या मुलीला सर्पदंश झाला असता तर तुम्ही असेच हसत गेला असता का? असा प्रश्न दीपके यांनी उपस्थित केला.
ग्रामीण भागातील शाळा, वसतिगृहांमध्ये पुरविला जाणारा पोषण आहार शिजविल्यानंतर १२ तासांनी विद्यार्थ्यांना दिला जातो. इतका शिळा व सडलेला आहार तुम्ही (मंत्री) स्वतःच्या मुलांना घाल का? मंत्र्याची कुत्री 'एसी'मध्ये राहतात. पण, आदिवासी मुले जनावरांसारखे आयुष्य जगतात. त्यांना चांगले जगण्याचा अधिकार आपण कधी देणार आहोत? गेल्या ८० वर्षांत आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. पण, आता यापुढे हा युवक शांत बसणार नाही.
आपल्या हक्कांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरावे लागेल. त्यासाठी राज्यातील सर्व आदिवासी युवकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे. उपोषण करून आपला जीव देण्यापेक्षा आपल्या अधिकारांसाठी मुंबईत आंदोलन उभे करू. आदिवासी बांधवांचे आंदोलन हे तुमच्या नेतृत्वात होईल, असे नियोजन करा. त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि आपण सोबतच मुंबईत जाऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा मुद्दा उपस्थित करत दीपके यांनी आदिवासी विकास विभागाला चांगलेच वारेवर धरले. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांचे बजेट असूनही विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन आणि अपुऱ्या सुविधा मिळतात, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करायला या सरकारकडे वेळ आहे. पण, आदिवासी समाज आणि रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे वेळ नाही. या निर्दयी सरकारला हृदय उरलेले नाही. युवकांनी फक्त उपोषण सोडावे, या निर्दयी सरकारच्या विरोधात आपण महाविकास आघाडीची वज्रमूठ उभी करून देशातील सर्वात मोठे आदिवासी आंदोलन नाशिकमध्ये उभे करू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगत, आदिवासींच्या सुरू असलेल्या 'जेन झी'च्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
मुख्यमंत्र्यांकडून सरकारी व आश्रमशाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत असल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत दीपके यांनी थेट आव्हान दिले.