Nashik Accident | मुंबई–आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ भीषण अपघात : चार वर्षीय मुलासह एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार!  
नाशिक

Nashik Accident | मुंबई–आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ भीषण अपघात : चार वर्षीय मुलासह एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार!

चालकाचा ताबा सुटल्याने कारचे नियंत्रण गेल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

देवळा, : तालुक्यातील उमराणे जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय मुंबई–आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ शुक्रवार (दि.६) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक सिडको कॉलनी (राजीवनगर) येथून मालेगावच्या दिशेने जात असलेली टाटा पंच ही कार (एमएच१५ जेएम ५१८२) उमराणेच्या उड्डाणपुलाच्या आधी भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळत पलटी झाली. अपघात इतका भीषण होता फाटक दबले जाऊन त्याचा मोठा मार त्यांना बसला. यामुळे गाडीतील चालक दिपक किशोर नाफडे (वय ३८), त्यांचा लहानगा मुलगा प्रथमेश दिपक नाफडे (वय ४ वर्षे) आणि त्यांची बहीण अंकिता किशोर नाफडे (वय २५) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (वय ५०), चारुलता संजय नाफडे (वय ४५) व पूजा दीपक नाफडे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे तातडीने हलविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चिंचवे येथील बाबाजी रुग्णवाहिका तसेच उमराणे येथील जे.के. रुग्णवाहिकेचे चालक राहुल वाघ व गणेश पवार हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती देवळा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस बेशिस्त होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहनचालक अतिवेगाने व बेशिस्तपणे वाहने चालवत असल्यामुळे वारंवार अपघात होत असून निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. राहुड घाटानंतर मोकळा रस्ता म्हणून चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. यामुळे या महामार्गावर गती नियंत्रित करणारे कॅमेरे बसवावेत, तसेच वाहनांच्या वेगावर कडक नियंत्रण ठेवून योग्य शिस्त लावावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

फोटो ओळ - उमराणे ता.देवळा येथील मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात कारची झालेली अवस्था (छाया ; सोमनाथ जगताप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT