देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
गेली १० वर्षे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्याने शेतकरी, कामगार परिसराच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. परंतु मागील गळीत हंगामात पुणे येथील संस्थाचालकांनी शेतकऱ्यांसह कामगारांनाही चुना लावल्याने कारखान्याचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर शेतकरी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
चार तालुक्यांतील १७ हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना २०१२-१३ पासून बंद होता. २०२२-२३ मध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारामुळे तो सुरू झाला. सलग तीन हंगाम यशस्वी झाल्यानंतर चौथ्या हंगामात पुणे येथील प्रसाद घावटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखाना बंद पाडला.
नियोजित गाळप न करता फेब्रुवारीअखेर कारखान्यातून पलायन केले. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून वीजबिल न भरल्यामुळे कारखाना अंधारात आहे. कारखाना गेटच्या आत बिबटे, अजगर, जंगली प्राणी आढळत आहेत.
तसेच यंदाच्या २०२६-२७ चा हंगाम सुरू होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. कामावर हजर असलेल्या कामगारांना पगार नाही, तसेच मागील वर्षाच्या उसाचे पेमेंटही मिळालेले नाही. या सर्व अडचणींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नासाका ऊस उत्पादक सभासद व कामगारांचा मेळावा गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता साखर कारखाना साईट येथे आयोजित करण्यात आला आहे.
कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन (चौकट)
१. मेळाव्यास खा. राजाभाऊ वाजे, आ. सरोज आहिरे, माणिकराव कोकाटे, राहुल ढिकले, हिरामण खोसकर तसेच माजी आमदार अनिल कदम आदी उपस्थित राहणार आहेत. शिवाय नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व माजी खा. हेमंत गोडसे यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.
२. मेळाव्यास ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते विष्णुपंत गायखे, संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव गायधनी, सचिव अनिल गायधनी यांनी केले आहे. युनियन पदाधिकारी, सभासद राजाराम गायधनी, छबू गायधनी, अशोक जाधव, कैलास टिळे, विठोबा घुले, नामदेवराव बोराडे, बबनराव कांगणे, रामचंद्र टिळे, सुभाष हुळहुळे, सुधाकर दळवी, पंडितराव सोनवणे, सुदाम नवले, शंकरराव रोकडे, शिवाजीराव म्हस्के, मोतीराम तिदमे आदींनी सदर मेळाव्यासाठी गेल्या आठवडभरात मोठी तयारी केलेली आहे.