नांदगाव (नाशिक) : नांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी शिवारात वीज पडून एक मेंढी व तीन बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
बुधवार (दि.27) रोजी सर्वत्र गणेशोत्वाची धूम असताना दुपारच्या सुमारास नांदगाव शहराजवळील मल्हारवाडी डोंगरावर कांदा व्यापारी भुषण धूत यांच्या कांदा वखारी समोरील परिसरात ज्ञानेश्वर म्हाळू शिंदे व त्याचा मुलगा हे मेंढ्या चारत होते. यावेळी वीज पडून एक मेंढी व तीन बकऱ्या जागीच ठार झाल्या. पैकी काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या असून पशुपालक आपले पशुधन वाचवण्याच्या प्रयत्नात आहे.
घटनास्थळी मल्हारवाडी गावच्या सरपंच अश्विनी मुकूंदा खैरनार यांनी त्वरित धाव घेऊन घटना स्थळावरून पशूवैद्यकीय डॉक्टर रोहीत कुऱ्हे यांना फोन लावून त्वरीत माहीती दिली. डॉ रोहीत कुऱ्हे व नानासाहेब काकळीज यांनी त्वरीत घटनास्थळी येत जखमी मेढयांना औषधोउपचार केले तसेच मयत मेढयांचे पोस्टमार्टम केले. तहसिल प्रशासनाला संपर्क साधत तलाठी यांना घटनेची माहीती देण्यात आली आहे. मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंदे याचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच अश्विनी मुकुंदा खैरणार यांनी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहीती सामाजताच कार्यकर्ते मुंकूंदा खैरणार यांनी आमदार सुहास कांदे यांना दिली. तसेच मेढंपाळाला शासकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली.