देवळा/मेशी : पुढारी वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील वाखारी येथे विवाहित महिला आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलींच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पतीसह चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
बुधवारी (दि. २२) सायंकाळी मनीषा जयेश वाघ (३०) यांनी आपल्या मुली सिद्धी (७) व खुशी (३) यांच्यासह घराशेजारील शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवून रात्री उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वाखारी येथील स्मशानभूमीत तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
फिर्यादी भास्कर वाळूबा जाधव (रा. राजदेरवाडी, ता. चांदवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनीषा वाघ यांना दोन मुली झाल्याचा राग मनात धरून तसेच माहेरून वारंवार पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता.
या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती जयेश रमेश वाघ, सासरे रमेश चिंतामन वाघ, सासू सुनंदा रमेश वाघ, दीर विकी रमेश वाघ (सर्व रा. वाखारी) तसेच नणंद सविता अजित बच्छाव (रा. सायने, ता. मालेगाव) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी पतीसह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.