नाशिक

MNGL billing troubles Nashik consumers |एमएनजीएलच्या मनमानी कारभाराने नाशिककर त्रस्त!

गॅसवापर बंद करूनही वाढीव बिल : ग्राहकांच्या विनंतीनंतरही जोडणी खंडित करण्याकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नामदेव भोर

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) च्या कारभाराबाबत शहरातील ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घर विकल्यानंतरही जुन्या ग्राहकाच्या नावावर वाढीव बिले आकारली जात आहेत. तसेच गॅसजोडणी बंद करण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे ग्राहकांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे नवीन पीएनजीजोडण्या देण्यावर भर दिला जात असताना, विद्यमान ग्राहकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

शहरात घरगुती वापरासाठी पीएनजीचा विस्तार करण्यासाठी एमएनजीएलकडून मोठ्या प्रमाणात जोडण्या दिल्या जात आहेत. मात्र, जोडणी घेतल्यानंतर घर विकले किंवा ग्राहकाला पीएनजी सेवा पुढे सुरू ठेवायची नसेल, तर कनेक्शन बंद करण्यासाठी ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून कनेक्शन बंद करण्याची विनंती केल्यानंतरही प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. तसेच ऑनलाइनद्वारे करण्यात आलेल्या विनंतीलाही कंपनीच्या ग्राहकसेवा केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ग्राहकांमधून प्रचंड संताप आहे.

शहरात ३६ हजारांवर ग्राहक

नाशिक शहरात ३६ हजारांवर ग्राहक पाइपलाइनद्वारे एमएनजीलचा गॅस घरगुती वापरासाठी वापरतात. मात्र यातील अनेक ग्राहक स्थलांतर अथवा घराची विक्री करतात. त्यांना गॅसचे कनेक्शन बंद करून त्यांची अनामत रक्कम कंपनीने परत करणे अपेक्षित असते. मात्र कनेक्शन बंद न करता, कंपनीकडून वाढीव विलाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असल्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बिलाच्या वसुलीसाठी वारंवार फोन करणारे कंपनीचे प्रतिनिधीही ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे

घर विकले, तरीही बिलाचा भुर्दंड

काही ग्राहकांनी घराची विक्री केल्यानंतर संबंधित पीएनजी कनेक्शन आपल्या नावावरून बंद करण्याची मागणी कंपनीकडे केली होती. मात्र, यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे जुन्या ग्राहकाच्या नावावरच बिल जमा होत राहिल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्षात गॅसचा वापर होत नसतानाही बिलात वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमधून कंपनीविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. घर विक्री प्रक्रिया पूर्ण होऊन घराचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतरही जुन्या ग्राहकाच्या नावावर वाढीव रक्कम आकारली जात असल्याने कंपनीच्या ग्राहकसेवा कक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्राहक सेवा की, नवीन जोडण्यांवर भर?

शहरात पीएनजीचा विस्तार करणे आणि अधिकाधिक ग्राहकांना जोडणी देणे ही कंपनीची व्यावसायिक गरज असली, तरी विद्यमान ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घर विक्री करणाऱ्या अथवा स्थलांतरित होणाऱ्या ग्राहकाच्या नावावर बिल तयार होऊ नये, कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळबद्ध असावी तसेच पात्र ग्राहकांची अनामत रक्कम तातडीने परत करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी एमएनजीएलने ग्राहकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा प्रभावीपणे राबवून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

बिलासंदर्भातील अडचणी, सायबर फसवणूक

नाशिकमध्ये एमएनजीएल ग्राहकांना लक्ष्य करून बनावट बिल, फोन कॉल आणि पेमेंट लिंकद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. २०२५ मध्ये एका ग्राहकाची ८० हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची पोलिस तक्रार नौदली गेली होती. ऑगस्ट २०२६ मध्येही एमएनजीएल अधिकारी असल्याचे भासवून एपीके फाइल पाठविण्याच्या फसवणुकीच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT