नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेचा गलथान कारभार, रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे आणि प्रशासकीय दिरंगाईचा थेट बळी नाशिकच्या निष्पाप विद्यार्थ्यांना द्यावा लागला. रविवारी (दि. १३) पार पडलेल्या यूपीएससी (NDA-NA II) परीक्ष दरम्यान, नाशिक शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे केवळ २ ते ३ मिनिटे उशीर झालेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
वर्षांनुवर्षांची कठोर मेहनत अवघ्या १८० सेकंदांच्या विलंबाने विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंचा आणि प्रचंड संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या पालकांकडून यूपीएससी परीक्षा निरीक्षकांची गाडीदेखील अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एकच गोंधळ उडाला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल प्रबोधिनी द्वितीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी शहरातील १३ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मात्र, के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील केंद्रावर प्रवेशाच्या वेळेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. काही विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांनी केंद्रावर पोहोचल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर प्रवेश नाकारण्यावरून गोंधळ उडाला. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक विद्यार्थी घरातून तासन्तास आधी निघूनही रस्त्यातील अडचणींमुळे केंद्रावर पोहोचायला अवघा काही मिनिटे उशीर झाला. विद्यार्थी हताश होऊन बंद दरवाजासमोर साकडे घालत होते—"फक्त २ मिनिटे झाली आहेत, आत जाऊ द्या!" पण प्रशासनाने निर्दयपणे दरवाजा बंदच ठेवला.
या संपूर्ण प्रकरणावर निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी थेट हात वर करत नियमांचे बोट दाखवले आहे. यूपीएससीच्या नियमांनुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे आधी प्रवेशद्वार बंद केले जाते. यात कोणत्याही अधिकाऱ्याला शिथिलता देण्याचे अधिकार नाहीत, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.
मुलांच्या वर्षांनुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे पाहून पालकांचा संयम सुटला. संतप्त पालकांनी केंद्राबाहेरच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर डोक्यावर घेतला. 'शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडी महापालिकेची, मग त्याची शिक्षा आमच्या मुलांनी का भोगायची?' असा थेट आणि आक्रमक प्रश्न पालकांनी उपस्थित केला. काही काळ परीक्षा केंद्राबाहेर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी ९.३० वाजता रिपोर्टिंगची वेळ निश्चित करण्यात आली होती. काही विद्यार्थी त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी केंद्रावर पोहोचले. मात्र, नियमांनुसार प्रवेशाची वेळ संपल्याचे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या दारात पोहोचूनही संधी हातातून निसटल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे यूपीएससीसारख्या परीक्षांसाठी कठोर शिस्त आवश्यक असली, तरी नाशिकमधील रस्त्यांची चाळण आणि वाहतूक व्यवस्थेचा बोऱ्या वाजलेला असताना प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना किंवा वाहतूक नियोजन का केले नाही? शहराच्या नाकर्तेपणामुळे आज अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटले गेले असून, या अन्यायाविरोधात आता संपूर्ण नाशिकमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.