नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे.
मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे, हा नियम आधीपासूनच लागू आहे.
मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या शहरांत अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. ज्या प्रदेशात आपण राहतो, त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यांत व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.