Marathi Boli Mahotsav
अंजली राऊत
नाशिक : मराठी बोलींचा महोत्सवाचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत कालिदास नाट्यगृह येथे दादासाहेब फाळके रंचमंचावर करण्यात आला.
या महोत्सवात 'अरे संसार संसार' कवयित्री बहिणाबाईंच्या गाणी, बोहाडा, अहिराणी गीतांना कार्यक्रम, विदर्भातील झाडीपट्टीतील नाट्यप्रयोग, आरोधी लोकनृत्य आणि लोकगीते, शिवबाचा जागर आणि 'शिकायला गेलो एक' हे प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार अभिनित लोकप्रिय मराठी विनोदी नाटक सादर करण्यात आले.
बोली भाषा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिणाबाईंची गाणी आणि कविता यावर आधारित 'अरे संसार संसार' हा कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतून जीवनदृष्टी मिळते, कृषी परंपरचे प्रगटीकरण होते. बहिणीबाईंची गाणी आणि कविता या जीवनाचे भाष्य शिकवते. दिग्दर्शक नारायण बाविस्कर, हार्मोनियम गोविंद मोकाशी, तबला पांडुरंग पाटील, बासरीवादन यश महाजन, हँन्डसोनिक रोहीत बोरसे यांनी वाद्यसंगत केली. तर श्रध्दा कुलकर्णी, अंजली धुमाळ, अक्षय नेहे, शुभार्थी कुलकर्णी, सोनाली राजे शिर्के पत्तटील, समृद्धी पाटील, सुनीला भोलाणे आणि हर्षल पाटील या गायकांनी बहिणाबाई यांच्या कविता सादर केल्या. बहिणाबाईंच्या काव्यातून त्यांची बुद्धीचातुर्य दिसते, जसे की, लेकीचा संसार चांगला व्हावा, लेक नांदावी म्हणून लेकीची माय कशी सासरी नांदते याचा प्रत्यय 'अरे संसार संसार' या कवितेतून करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमधील दुर्गम भागातील परंपरा बोहाडा नृत्यप्रकार त्र्यंबकेश्वर येथील मोखाडा येथील आदिवासी कलाकारांनी सादर केला. राजन वैद्य हे बोहाडा नृत्यप्रकारातील जाणते कलाकाराने अतिशय उत्तम कलाकृती सादर करत ४५ कलाकरांचा ताफा सोबत घेऊन अध्यात्मच प्रत्यक्ष रंगमंचावर सादर केला. बोहाडा मुखवटे नृत्यप्रकार सादर होत असतांना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येऊन रोमांच निर्माण केला. यामध्ये गणेशपूजन, हनुमान, खंडेराव, भैरवनाथ, त्राटीका (शूर्पनखा), गजासूर, नरसिंव्ह आणि रक्तबीज या असूरांचा संहार करण्यासाठी प्रकटलेली रक्तादेवी यांचे नृत्य सादर झाले. या नृत्यामध्ये रक्तादेवी ही रक्ताबीजाचा अंत करण्यासाठी रक्ताबीज या असूराचे रक्त प्राशन करताना झालेले युद्ध रंगमंचावर सादर करताना प्रेक्षकांचे डोळे विस्फारले आणि हा क्षण अक्षरश: रोमांच निर्माण करणारा ठरला.
विनोद कुमावत आणि विधी खैरनार या कलाकारांनी 'झुमकावाली पोर' हे अहिराणी गीतातील नृत्यप्रकार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आणि वन्स मोअर करत नाशिककरांनी या गीताचा आस्वाद घेत जागेवरच पावली थिरकवली. त्यानंतर पुष्पा पाटील यांनी कानबाई उत्सवावर नृत्यप्रकार सादर करत खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडविले. मीना पाटील यांनी अहिराणी बोलीभाषेतील गीत गायली. गोकूळ पाटील आणि भैय्या मोरे यांच्या टिमने अहिराणी गीतांच्या कार्यक्रमात वाद्याची साथसंगत केली.
सुमारे दीडशे वर्षांची नाटक परंपरा असलेली झाडीपट्टीची रंगभूमी कालिदासमध्ये सादर करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील झाडीपट्टीची कला सादर करण्यात आली. झाडीपट्टी विदर्भातील नाट्यप्रकारातील 'गद्दार' नाटक हे एका स्त्री सरपंचाच्या कथेवर सादर करण्यात आले. गावातील पुरुष स्त्रीला सरपंच करतो, कारण ती सीट राखीव असते, परंतु ग्रामपंचायतचा कारभार मात्र एक पुरुष सांभाळतो, या नाटकातील स्त्री ही प्रामाणिक आहे, भ्रष्टाचार तिला आवडत नाही, पण तिचा नवरा भ्रष्टाचार करायला भाग पाडतो, हे करत असताना तो कुटुंबाचाही विचार करत नाही, वेळप्रसंगी स्वत:च्या मुलाचाही विचार करत नाही. बायकोचा तर अजिबात विचार करत नाही, फक्त त्याला पैसा आणि पैसा हेच दिसत असते. राजकारण म्हणते स्वतःच्या कमाईचे साधन समजतो, या सर्व प्रकारात त्याचं कुटुंब उध्वस्त होतं. अशी झाडीपट्टी विदर्भातील नाट्यप्रकार यावेळी सादर करण्यात आला.
मिलिंद येनगंटीवार निर्मित, आनंद भिमटे लिखित आणि नरेड गडेकर दिग्दर्शित 'गद्दार' नाटकात बालकलाकार गंधर्व गडेकर, देवेंद्र दोडके, नरेश गडेकर, अरविंद झाडे, देवेंद्र लुटे, निशांत अजबेले, चिन्मय देशकर, आसावरी तिडके, सोनाली निस्ताने, पोर्णिमा तायडे, मयुरी दिघोरे, प्रयोग सहाय्यक प्रफुल्ल फुकटे या कलाकारांनी भूमिका सादर केल्या.
मराठी बोलींच्या महोत्सवात विदर्भातील नाट्यप्रकारानंतर सांस्कृतिक कायक्रमात आराधी लोकनृत्य आणि लोकगीते सादर करण्यात आली. तसेच शिवरायांचे तेज नसानसांमध्ये भिनवणारा असा 'जागर शिवबाचा' हा शाहीरी कार्यक्रम शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी सादर करत शिवप्रेमींमध्ये शिवबाचा प्रराक्रम आणि जाज्वल्य निर्माण केले. सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर केले. त्यानंतर 'शिकायला गेलो एक' हे प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार अभिनित लोकप्रिय मराठी विनोदी नाटकाने मराठी बोली महोत्सवाची सांगता करण्यात आली.
पूर्वी लाकडापासून मुखवटे तयार केले जायचे. त्यामुळे अक्षरश: ८० किलो वजनाचे मुखवटे पेलून नृत्यप्रकार सादर केला जायचा. तेवढे वजन पेलण्याची ताकद आजच्या कलाकारामध्ये नाही. त्यामुळे आता साधा पेपर आणि रानातील बाभळाचा डिंक वापरून त्याच्या लगद्यापासून मुखवटा तयार करण्यात येतो. हा मुखवटा वजनाने हलका असल्याने किमान ३० किलो वजनाचे मुखवटे परिधान करत आजचा कलाकार कला सादर करत आहे. सण उत्सवात ढोल नृत्य, मोरगा नृत्य सादर केली जातात आणि आता विश्व मराठी संमेलनात अशाप्रकारे वेगवेगळे सोंग सादर करण्याची संधी मिळाल्याने मराठी भाषा आणि परंपरेचे गौरव होत असल्याचा अभिमान आहे.- राजन वैद्य, बोहाडा, मुखवटा नृत्यप्रकार कलाकार
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज हे झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचे माहेरघर आहे. वडसा या गावी जवळपास ५० च्या वर नाटक कंपनी आहेत. दिवाळी ते होळी असा या नाटकांचा हंगाम असतो. एका नाटक कंपनीत अभिनेता, अभिनेत्री व तंत्रज्ञ अशी जवळपास ३५ लोकांची टीम असते. रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत नाटकाचे सादरीकरण होते. १००० ते २००० प्रेक्षकांची उपस्थिती नाटकाला असते. संपूर्ण नाट्यगृह हे बांबूच्या सहाय्याने कापडी कामानीचे निर्माण केलेले असतात. महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून झाडीपट्टी रंगभूमीवर काम करण्यासाठी स्त्री व पुरुष कलावंत सहभागी झाले आहेत. झाडीपट्टीची रंगभूमी ही खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमी बनली आहे.- देवेंद्र दोडके, झाडीपट्टी नाट्यप्रकार, कलाकार