येवला: पुढारी वृत्तसेवा : आम्ही तुम्हाला आपले मानले, पण तुम्ही आम्हाला आपले मानायला तयार नाही, असा टोला छगन भुजबळ यांना देत गेल्या ७० वर्षात भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले आहे. त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही, याची जाणीव ठेऊन आमच्या आरक्षणाला विरोध करू नका, असा इशारा देऊन राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.९) येथे केला. येवल्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. (Manoj Jarange-Patil)
मनोज जरांगे- पाटील यांचे येवल्यात आगमन होताच २० जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील विंचूर चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जरांगे -पाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. मंचावर आगमन होताच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जरांगे – पाटील यांनी विशाल जनसमुदायाला मार्गदर्शन केले. (Manoj Jarange-Patil)
येत्या १४ तारखेला अंतरवेली सराटी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले . मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सभेत सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या मेळाव्यास हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
मराठा आरक्षण लढ्याचा चर्चित चेहरा बनलेल्या मनोज जरंगे पाटील सध्या राज्याचा दौऱ्यावर आहेत. येवला येथे त्यांचे आगमन होताच तहसील कार्यालय आवारात मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देत आंदोलकांशी चर्चा करत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा