नाशिक : केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत घसरणीची परंपरा कायम राखत नाशिककरांना स्वप्नभंगाचे धक्के देणाऱ्या नाशिक महापालिकेला राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा ४.०' अभियानात यंदाही 'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक' या बिरुदावलीला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या अभियानात अमृत सिटी गटातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांच्या गटात गतवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक नवव्या स्थानी कायम राहिले आहे. पिंपरी चिंचवडने पहिले तर, नवी मुंबईने दुसरे स्थान कायम राखले असून, ठाणे महापालिकेने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
पिंपरी चिंचवड ८०४४
नवी मुंबई ६८७२
ठाणे ६४३६
पुणे ६१८६
कल्याण-डोंबिवली ५३५९
छत्रपती संभाजीनगर ५०३१
नागपूर ४८०४
वसई विरार ४४२९
नाशिक ३५३९
बृहन्मुंबई ३२४७
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पृथ्वी, वायु, जल, अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत 'माझी वसुंधरा' अभियान राज्यामध्ये २ आॅक्टोबर २०२०पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षात राज्यातील ४३ अमृत शहरे, २२२ नगरपरिषदा, १३० नगरपंचायती व २९१ ग्रामपंचायती अशाप्रकारे राज्यभरातील एकूण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. महापालिकेला दीड कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळाले होते. त्यामुळे स्वच्छ, सुंदर, हरित नाशिकची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यानंतर १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या दरम्यान 'माझी वसुंधरा २.०' अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या निकालातून मात्र नाशिककरांची घोर निराशा झाली. नाशिक महापालिका तब्बल २०व्या स्थानावर फेकली गेली. त्यानंतर गतवर्षी 'माझी वसुंधरा ३.०' या अभियानात नाशिक महापालिका नवव्या स्थानावर होती. यंदा माझी वसुंधरा ४.० अभियानात नाशिक महापालिकेचा पहिल्या तीन क्रमांकात समावेश होईल, अशी अपेक्षा होती. परंतू नाशिकचा नववा क्रमांक कायम राहिला आहे.
या अभियानात नाशिकसह राज्यातील ४१४ नागरी स्वराज्य संस्था, तसेच २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. या अभियानात नाशिक महापालिकेच्या पदरात जेमतेम ३५३९ गुण पडू शकले आहेत. गतवर्षी माझी वसुंधरा ३ अभियानात नाशिक महापालिकेला ३३१२ गुण मिळाले होते.