नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) रविवारी (दि. २८) होत आहे. परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. राज्यातील १ हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजरे राहणार आहे. पेपरफुटी, तोतयेगिरी आणि अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत.
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त्त महेश चोथे यांनी परीक्षेच्या आयोजनाची माहिती दिली. यापूर्वी दि. २१ जून रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता दि. २८ जून रोजी होत आहे. यंदा पेपर १ साठी २ लाख ५८ हजार ६१ उमेदवारांनी नोंदणी असून, १० हजार ९४६ खोल्यांची व्यवस्था आहे.
तर पेपर २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ उमेदवार प्रविष्ट असून, १४ हजार ५६८ खोल्यांची व्यवस्था आहे. असे दोन्ही पेपर मिळून सुमारे सहा लाख परीक्षार्थी आहेत. प्रश्नपत्रिकेवर स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा गैरवापर झाल्यास अथवा ती बाहेर गेल्यास त्याचा तत्काळ मागोवा घेणे शक्य होणार आहे.
तसेच परीक्षा केंद्रांवरील हालचाली सीसीटीव्हीत रेकॉर्ड होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीईटी पात्रता अनिवार्य असल्याचा निर्णय कायम ठेवल्यामुळे यंदाच्या परीक्षेला विशेष महत्त्व आले आहे. सेवेत कार्यरत शिक्षकांनाही २०२८ पर्यंत पात्रता मिळविण्याची मुदत देण्यात आल्याने मोठ्या संख्येने शिक्षकांनी नोंदणी केली आहे.
उमेदवारांची प्रवेशपत्रे दि. १६ जूनपासून त्यांच्या लॉगइनमध्ये ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. परीक्षार्थीनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे तसेच वैध ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. परीक्षा केंद्रांमध्ये दुपट्टा, बुरखा, मास्क आणि टोपी घालून प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत