नाशिक : निखिल रोकडे
राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात काही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. जवळपास ९०० संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण राज्यभर पसरली आहे.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके करत आहेत. म्हाडा घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपास हाताळलेल्या मिटके यांच्या नेतृत्वाखाली वेगाने तपास सुरू आहे. तपासाच्या कक्षेत काही वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालक आले आहेत.
अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे आरोपपत्र २० हजार पानांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा राज्यातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि प्रशासकीय घोटाळ्यांपैकी एक मानला जात आहे. माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आठ महिन्यांपासून कारागृहात आहेत. विद्यमान शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी जामीन मिळवत अटक टाळली आहे.
अनेक प्रस्तावांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांचा सहभाग केंद्रस्थानी आल्याची चर्चा आहे. सेवानिवृत्तीनंतरही काही प्रस्तावांवर सह्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने तपास गुंतागुंतीचा झाला आहे. चाळीसगाव येथील शिक्षण संस्थेत १६४ बनावट शालार्थ आयडी तयार करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जाते. संस्थाचालक धनंजय चव्हाण यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्यामुळे संशय गडद झाला आहे. या प्रकरणातील संबंधितांना संरक्षण मिळत आहे का, असा प्रश्नही शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
राज्यभरातील बोगस भरती प्रकरणांची चौकशी तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. २०२५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने जळगावच्या १० शाळांची चौकशी करत कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
त्यानंतर एसआयटीने तपासाची व्याप्ती वाढवून अधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या भूमिकेची छाननी सुरू केली. सोशल मीडियावर नाशिक, धुळे आणि जळगावमधील ७२ शाळांची यादी व्हायरल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. आगामी काळात धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे.