नाशिक : धनराज माळी
राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आस्थापनावरील गट-क व गट ड च्या तीन हजार १३८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील उमेदवारांची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबविणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाने संकेत दिले आहेत. राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क व गट-ड ची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.
त्यामुळे कामकाजात आहेत त्या कर्मचाऱ्यांवर बोजा वाढला आहे. रिक्त जागांच्या भरतीसाठी संबंधित नगर परिषद व नगरपंचायतींकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
लवकरच २०२६ मध्ये रिक्त असलेली ३ हजार १३८ जागा भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या रिक्त जागांमध्ये कोकण, पुणे, गडचिरोली, संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर विभागांचा समावेश आहे.
बेरोजगारांना मिळेल संधी राज्यातील या रिक्त पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना त्या त्या शहरातील बेरोजगार हातांना काम मिळेल. ही भरती दिलासादायक ठरणार आहे. तसेच संबंधित विभागातील रिक्त जागा भरल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर असलेला अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे. त्यासोबतच कामांना गती मिळणार आहे.
जिल्हानिहाय क-ड रिक्त पदांची एकूण संख्या :
कोकण विभाग : सिंधुदुर्ग-२९, रायगड-४९, ठाणे-३६, पालघर -५१ एकूण - २०० पदे पुणे विभाग : पुणे-५४, सातारा-१२१, सांगली-९९, सोलापूर-९५, कोल्हापूर -४३, एकूण-४१२ अमरावती : बुलढाणा -११४, यवतमाळ-१४९, वाशिम-४९, अकोला-७५, अमरावती-१००, एकूण-४८७ नाशिक : नंदुरबार-४३, जळगाव-१२४, नाशिक-८३, नगर-१३२, धुळे-२९, एकूण - ४११ छ. संभाजीनगर: बीड-१५७, परभणी-७६, जालना-७१, छ. संभाजीनगर- ९१, नांदेड-२२३, लातूर-७०, हिंगोली-५१, उस्मानाबाद ४४९, एकूण ११८८, तर नागपूर विभागात ४४० जागांचा समावेश.