नाशिक : सतीश डोंगरे
Foreign direct investment (FDI) has played a major role in India's rise to become the world's fourth largest economy, surpassing Japan.
जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या भारताच्या घौडदौडमध्ये 'एफडीआय' अर्थात थेट विदेशी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. सुरक्षा, सरकारी धोरणे, पायाभूत सुविधा आणि केंद्राबरोबरच राज्यातील सरकारची स्थिरता एफआयडीआयला आकर्षित करणारी ठरत आहे. विशेषत: सिंगापूरमधून 'एफडीआय'चा ओघ मोठा असून, पाठाेपाठ मॉरिशस, अमेरिका, नेदरलॅण्ड्स, जपान, सायप्रस, यूके, जर्मनी आणि केमन बेटे यांचा क्रमांक आहे. देशात येणाऱ्या एफडीआयमध्ये महाराष्ट्राचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
२०२४-२५ मध्ये भारतात सुमारे १५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी विदेशी गुंतवणूक आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण थेट परकीय गुंतवणूक १४ टक्क्यांनी वाढून ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. त्यात सिंगापूर मागील सात वर्षांपासून भारतातील एफडीआयमध्ये आघाडीवर आहे. सिंगापूरमधून २०२४-२५ मध्ये १४.९४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. २०२३-२४ मध्ये हा आकडा ११.७७ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. २०१७-१८ मध्ये भारतात मॉरिशसमधून सर्वाधिक विदेशी गुंतवणूक येत होती. मात्र, १८-१९ पासून सिंगापूरने मॉरिशसची जागा घेतली असून, मागील सात वर्षांपासून ती कायम राखली आहे.
सिंगापूर - १४.९४ अब्ज
मॉरिशस - ८.३४ अब्ज
अमेरिका - ५.४५ अब्ज
नेदरलॅंडस - ४.६२ अब्ज
यूएई - ३.१२ अब्ज
जपान - २.४७ अब्ज
सायप्रस - १.२ अब्ज
यूके - ७९५ दशलक्ष
जर्मनी - ४६९ दशलक्ष
केमन बेटे - ३७१ दशलक्ष
(आकडे अमेरिकन डॉलरमध्ये)
थेट परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्रात देशात अव्वलस्थानी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक (५६,०३० कोटी), दिल्ली (५१,५४०), गुजरात (४७,९४७), तामिळनाडू (३१,१०३) या राज्यांचा क्रमांक आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात ३२ टक्के इतकी थेट परकीय गुंतवणूक आली होती. आता हा आकडा ४० टक्क्यांवर गेला आहे.
भारतामध्ये सिंगापूरबरोबरच युरोपियन देशांमधून थेट परकीय गुंतवणूक वाढत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण कनेक्टिव्हिटी आहे. याशिवाय भारत-सिंगापूर व्यापार करार असल्याने, त्याचा फायदा परकीय गुंतवणूक वाढीसाठी होत आहे.संजय सोनवणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर, नाशिक.
आग्नेय आशियामध्ये सिंगापूरचे स्थान मोठे असून, त्याठिकाणी भारतीयांचे मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे सिंगापूरमधील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. भारताच्या परराष्ट्रीय व्यवहारात व्यावसायिक दृष्टीकोन असल्याने, गुंतवणूकीचा ओघ वाढत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार भारत आणि सिंगापूरमधील अंतर देखील गुंतवणूकीस पोषक ठरत आहे.धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा