नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागात नोकरीच्या आमिषाने नेऊन अडकविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत अडकलेल्या नाशिकच्या तरुणांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून त्यांना धीर दिला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सुरक्षित सुटकेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील २५ हून अधिक तरुणांची फसवणूक झाली असून, देशभरातील ४०० हून अधिक युवक या रॅकेटमध्ये अडकले आहेत. फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींना भुलून हे तरुण थायलंडला गेले. त्यानंतर त्यांना म्यानमार सीमावर्ती भागात नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
या तरुणांकडून दररोज १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात असल्याची माहिती माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली आहे. काम करण्यास नकार दिल्यास अमानुष छळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि बँकॉक येथील भारतीय दूतावासाशी त्वरित समन्वय साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री महाजन यांनी सांगितले की, राज्य शासन या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून असून, केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, भारतीन दूतावास आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रत्येक तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाट प्रयत्न सुरू आहेत.
तसेच अडकलेल्य युवकांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जात शासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहनह त्यांनी केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परदेशान नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांनी सोशत मीडियावरील आकर्षक जाहिरातींवर विश्वान ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनी, एजंट आणि रोजगा प्रक्रियेची सखोल पडताळणी करावी, अन आवाहन प्रशासनाने केले आहे.