SSC HSC Board Pudhari
नाशिक

SSC HSC Board Exam| दहावीचा निकाल लागून २२ दिवस, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच नाही!

NEET परीक्षेतील वाद आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असताना हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपल्यानंतर अवघ्या ५० दिवसांत म्हणजे ८ मे रोजी निकाल जाहीर केला. या निकालाने विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का मिळाला होता. मात्र निकाल लागून तब्बल २२ दिवस उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप गुणपत्रिका पोहोचलेली नाही.

शाळांची अडचण

शाळांना मंडळाकडून गुणपत्रिका न मिळाल्यामुळे अनेक शाळांना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले (TC) देता येत नाहीत. एकीकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसताना, दुसरीकडे शासनाने २९ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू केली आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रकरण मानले जात आहे.

विद्यार्थ्यांपुढील समस्या

गुणपत्रिका न मिळाल्याने कनिष्ठ महाविद्यालयात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. गुणपत्रिका मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक किंवा इतर तांत्रिक अभ्यासक्रमांकडे वळू शकतात. अशा वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द होणे, रिक्त जागा निर्माण होणे व यादीत बदल होणे यांची शक्यता आहे. बारावीच्या निकालानंतर NEET परीक्षेतील वाद आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असताना हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व स्थिती

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे दाखले न मिळताच ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात हा प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासातील अभूतपूर्व परिस्थिती मानला जात असून विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT