

जवळाबाजार : ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात जवळाबाजार परिसराने आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (बारावी) निकालात परिसरातील सर्व महाविद्यालयांमध्ये मुलींनीच प्रथम क्रमांक पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जवळाबाजार परिसरातील शिक्षण संस्था आणि शिक्षक वर्ग घेत असलेल्या मेहनतीमुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या पाल्याने स्थानिक स्तरावरच शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे, असा कर परिसरातील ५० ते ६० गावातील कुटुंबातील पालकवर्गा दिसून येत आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कष्टांमुळे यंदाचा निकाल उत्कृष्ट लागला असून, यामध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय: येथील कला शाखेचा निकाल ९०% लागला असून गायत्री एकनाथ कुरहे हिने ८६.८३% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.
एम.आय.पी. ज्युनियर महाविद्यालय: या महाविद्यालयाने निकालात मोठी झेप घेतली आहे. विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून जोहा मुजीब इनामदार (८७.१७%) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कला शाखेचा निकाल ९०.४३% लागला असून प्रतिक्षा निवृती नवले (७८.१६%) हिने यश संपादन केले.
बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय (बाराशिव): येथील विज्ञान शाखेचा निकाल ९९.३४% लागला असून साधना विनायक कदम (७९.५०%) हिने प्रथम क्रमांक मिळवला. कला शाखेत ८७.१८% निकालासह शालीनी विश्वनाथ पवार (८४.५३%) हिने वर्चस्व गाजवले.
कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये मुलींनीच अव्वल स्थान पटकावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या यशाबद्दल संबंधित शिक्षण संस्थांचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि पालकांकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. ग्रामीण भागातील या मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.