नाशिक : निखिल रोकडे
कारागृहाच्या उंच भिंतीआडचे जग अनेकांसाठी आजही गूढच आहे. बाहेरच्या समाजात कैद्यांच्या जीवनाबाबत, विशेषतः त्यांच्या आहाराविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. चित्रपट, मालिका आणि कथांमधून तयार झालेली प्रतिमा ही अनेकदा वास्तवापेक्षा वेगळी असते. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कैद्यांना कमी खर्चात, पण पौष्टिक, संतुलित आणि आरोग्यदृष्ट्या योग्य असा आहार देणे बंधनकारक आहे.
जेवणासाठी लागणारे धान्य, किराणा व इतर साहित्य कारागृह प्रशासनाकडून नियमानुसार खरेदी केले जाते. अनेक कारागृहांमध्ये स्वतःची शेती असून, त्या शेतीत पिकवलेला भाजीपाला थेट कैद्यांच्या ताटात पोहोचतो. त्यामुळे “कारागृहातील अन्न निकृष्ट असते” ही सर्वसाधारण समजूत वास्तवाशी पूर्णतः जुळणारी नाही. कारागृहातील शेतीपासून ते कैद्याच्या ताटापर्यंतचा प्रवास हा एक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि नियंत्रित प्रक्रियेचा भाग असतो.
उंच भिंती, लोखंडी गज आणि शिस्तीची अटळ
या साऱ्यांच्या आड एक वेगळेच जग वसलेले असते. हे जग केवळ बंदिस्त नसून, नियम, वेळापत्रक आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असते. कैद्यांचा दैनंदिन दिनक्रम हा ठरावीक चौकटीतच फिरत असतो. येथे प्रत्येक गोष्ट वेळेवर, नियमानुसार आणि काटेकोर पद्धतीने पार पाडली जाते.
सकाळी ७ ते ८ – चहा व नाश्ता
(पोहे / उपमा / शिरा आणि एक केळी)
सकाळी १० ते ११ – दुपारचे जेवण
(भाजी, चपाती, भात व वरण)
दुपारी १२ – मोजणी व बॅरेकमध्ये रवानगी
दुपारी ३ – पुन्हा बाहेर काढणे
सायं. ४ – चहा
सायं. ५ – रात्रीचे जेवण
अनेक कैद्यांना सायंकाळी ५ वाजता जेवण करण्याची सवय नसते. त्यामुळे काही कैदी हे जेवण जवळ ठेवतात आणि बॅरेकमध्ये परतल्यानंतर उशिरा जेवण करतात. सणासुदीच्या दिवशी मात्र दिनक्रमात थोडा बदल होतो. गोड पदार्थांची विशेष मेजवानी देऊन ताटात गोडवा आणला जातो, ज्यामुळे बंदिस्त जीवनातही सणाचा अनुभव निर्माण केला जातो.
मांसाहारी जेवणाची मागणी असल्यास कैद्यांना ते कारागृहाच्या आहार व्यवस्थेतून मिळत नाही. अशी इच्छा असल्यास कैद्यांना कुटुंबीयांकडून आलेल्या मनीऑर्डरमधून ते विकत घ्यावे लागते. मागणीच्या संख्येनुसारच ते तयार केले जाते. म्हणजेच, मांसाहार ही सुविधा “सर्वसामान्य” नसून नियमबद्ध आणि नियंत्रित स्वरूपातच उपलब्ध असते.
कैद्यांना बाहेर-आत करण्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त अशीच असते. यामागील कारण केवळ शिस्त नाही, तर सुरक्षा आहे. सूर्यप्रकाशात प्रत्येक व्यक्ती स्पष्ट दिसावी, हा सुरक्षेचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे मोजणी, हालचाल आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते. मात्र, हिवाळ्यात धुक्यामुळे वेळेत अपवादात्मक बदल केले जाऊ शकतात.
दररोज हजारो कैद्यांसाठी दोन वेळचा चहा, दोन वेळचे जेवण आणि एक वेळचा नाश्ता तयार करणे हे अत्यंत कष्टाचे, नियोजनबद्ध आणि जबाबदारीचे काम असते.
साधारणतः एकूण कैद्यांच्या सुमारे ५% कैदी स्वयंपाकघरात कार्यरत असतात.
उदाहरणार्थ,
जर ३,००० कैदी असतील, तर सुमारे १५० कैदी दोन सत्रांत काम करतात.
पहिले सत्र (पहाटे ३ ते सकाळी ९) –
७५ कैदी नाश्ता व दुपारचे जेवण तयार करतात.
दुसरे सत्र (सकाळी ९.३० पासून) –
उर्वरित ७५ कैदी दुपारचा चहा व सायंकाळचे जेवण बनवतात.
ही प्रक्रिया म्हणजे शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सामूहिक जबाबदारीचे जिवंत उदाहरण आहे. येथे स्वयंपाक हा केवळ काम नसून, एक व्यवस्थात्मक प्रणाली आहे.
जेलमध्ये कैद्यांना घरून चांगले जेवण मिळते, अशा अनेक सुरस कथा आपण ऐकलेल्या आणि चित्रपटांमध्ये पाहिलेल्या असतात. प्रत्यक्षात मात्र नियम अत्यंत कठोर आहेत. सामान्यतः घरचे जेवण देण्यास मनाई असते.
फक्त न्यायालयाच्या आदेशाने, अपवादात्मक परिस्थितीतच अशी परवानगी दिली जाऊ शकते. आणि अंतिम निर्णय कारागृह प्रशासनाचाच असतो.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील बहुतेक कारागृहांमध्ये न्यायालयीन परवानगी असली तरी, प्रशासनाकडून अंतिम क्षणी नकार दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात घरचे जेवण मिळणाऱ्या कैद्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे.