नाशिक : 'नाशिक पूर्व'च्या दिंडोरी, कळवण, येवला, कनाशी, चांदवड, मालेगाव, ताहाराबाद आदी वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तब्बल १,१०९ जनावरे बिबट्यांच्या हल्ल्यांत बळी पडली आहेत. याशिवाय चार जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. परिणामी, अन्नसाखळीतील बदलामुळे बिबटे शिकारीसाठी शहरांकडे वळत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
दोन दिवसांपूर्वीच देवळा वनकर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान, गुंजाळनगर परिसरातील शासकीय विश्रामगृहालगत बिबट्या निदर्शनास आला होता. भाबडबारी घाटात रुग्णवाहिकाचालकांनाही बिबट्या दिसला हाेता. शहरातील घारपुरे घाट आणि मल्हार खाण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यामागील परिसरात माजी खासदार प्रताप वाघ यांचे कुटुंबीय राहतात. त्यांच्या बंगल्याच्या परिसरात गोदाकाठाने १६ जूनच्या रात्री ८ च्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले होते. पोलिसांच्या गस्ती पथकाने खात्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार आणि झाडाझुडुपांचा भाग यामुळे बिबट्या पुन्हा निदर्शनास आला नाही. अशा घटना ठिकठिकाणी घडत आहेत.
दिंडोरी, नांदगाव, येवला, मालेगाव, सटाणा, ताहाराबाद व कनाशी भागांत मोठ्या प्रमाणात ऊसलागवड होत असल्याने तेथे बिबट्यांची संख्या वाढली आहे. उसाच्या फडात मानवी हस्तक्षेप कमी असल्याने बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. त्यामुळे बिबट्या व त्याची पिले नऊ महिने ऊस फडात राहतात. परिणामी, या परिसरात भटक्या श्वानांवर व पशुधनावर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १,१०९ पशुधन हानीच्या, तर ९९ शेतीपिकांच्या नुकसानीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
दिंडोरी, कळवण, देवळा आणि ताहाराबाद परिसरात बिबट्याकडून मानवी हल्ल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यात वनारवाडी (ता. दिंडोरी) येथे विठ्ठल भिवा पोतदार (16) या मुलाचा मृत्यू झाला. अशा घटनांमध्ये शासनाकडून 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र पोतदार कुटुंबीय रोजगाराच्या शोधात सतत स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्याकडून बँकेशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनाची आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही.
वनपरिक्षेत्र एकूण हल्ले
दिंडोरी - 252
कळवण - 77
देवळा - 47
येवला - 109
नांदगाव - 45
चांदवड - 61
कनाशी - 73
उंबरठाण - 08
सुरगाणा - 21
मालेगाव - 113
सटाणा - 94
ताहाराबाद - 209
एकूण - 1,109
पंचवटीच्या मानेनगर येथे दि. 20 ऑक्टोबर रोजी उद्धव अहिरे यांच्या विहिरीत मृत बिबट्या आढळला होता. 20 दिवसांनंतरही वनविभागाला मारेकऱ्याचा तपास लागलेला नाही. शवविच्छेदनानंतरचा व्हिसेरा अद्याप न मिळाल्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला आहे. तारकुंपणाच्या साहाय्याने सिमेंट पोलला बांधून बिबट्याला विहिरीत फेकण्यात आले होते.
नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालल्यामुळे बिबट्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविला आहे. बिबट्या हा धोकादायक प्राणी असून, त्याच्या हल्ल्याचा अंदाज बांधता येत नाही. बचावासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, शेतात गटाने जाणे, लाठ्याकाठ्या व टॉर्च बाळगणे, लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे.संतोष सोनवणे, सहायक वनसंरक्षक, नाशिक पूर्व वनक्षेत्र