मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहराची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांच्या कथित वास्तव्याबाबत स्थापन केलेल्या एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे मनपा गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी अपर जिल्हाधिकारी व अपर पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात, गेल्या दीड वर्षापासून सोमय्या हे वारंवार मालेगाव दौऱ्यावर येत असून, प्रत्येक भेटीनंतर प्रशासनात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व दडपणाचे वातावरण निर्माण होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांशी अधिकृत भेटीनंतर माध्यमांसमोर दिली जाणारी वक्तव्ये शहराची प्रतिमा राज्य व देशपातळीवर मलिन करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मंगळवारी (दि.२४) अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पोलिस स्टेशनच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी मालेगाव शहर दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचा आरोप केला.
अशी भडकावू व द्वेषपूर्ण विधाने सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी असून नागरिकांमध्ये भीती, अस्वस्थता निर्माण करतात आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहेत.
मालेगाव हे मेहनती, उद्योगशील व शांतताप्रिय नागरिकांचे शहर असून, काही व्यक्तींच्या राजकीय हेतूसाठी संपूर्ण शहराला बदनाम करणे म्हणजे शहराचा अपमान असल्याचेही डिग्निटी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्यावर आवश्यक त्या कायदेशीर तरतुदीनुसार निर्बंध घालावेत आणि मंगळवारी केलेल्या वक्तव्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एसआयटी अहवाल सादर करावा
मालेगावात रोहिंग्या व बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याच्या आरोपांवरून ६ जानेवारी २०२५ विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. सहा महिन्यांत अहवाल सादर करणे अपेक्षित असतानाही एक वर्ष उलटूनही अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मालेगावमध्ये अशा नागरिकांच्या वास्तव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा दावा करत, चुकीच्या माहितीतून एसआयटी स्थापन झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे एसआयटीचा संपूर्ण व सविस्तर अहवाल तत्काळ जाहीर करावा तसेच त्याची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. सामाजिक सलोखा, प्रशासनावरील जनतेचा विश्वास व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आवाहनही प्रशासनाला करण्यात आले आहे. यावेळी अतहर हुसेन अन्सारी, निसार खान, मौलाना जाहीद नदवी, बबलू कुरैशी, शोएब आझमी, आतिफ अत्तार, अब्दुल रहेमान अन्सारी, फैजान रिज्जू, जावीद गुलनार, अबुलैस अन्सारी आदी उपस्थित होते.