नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने यंदा खरिपाचे क्षेत्र घटणार, या भीतीवर मात करत नाशिक जिल्ह्यात खरिपाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यांनी मारलेली बाजी आणि भात पट्ट्यात वेगाने सुरू असलेली 'भात आवणी' (पुनर्लागवड) यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये यंदा १०० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. या भागात शेतकऱ्यांनी मका पिकाला मोठी पसंती दिली आहे. परिणामी, जिल्ह्यात एकूण मक्याचे लागवड क्षेत्र उद्दिष्टाच्या तब्बल १२४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात सध्या खरिपाची एकूण पेरणी ८४ टक्के झाली असली, तरी मुख्य आठ तालुक्यांमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. यात येवला (१११ टक्के), निफाड (१०५ टक्के), सिन्नर (१०४ टक्के), नांदगाव (१०४ टक्के), चांदवड (१०३ टक्के), देवळा (१०० टक्के), कळवण (१०० टक्के) आणि बागलाण (९० टक्के) या तालुक्यांचा समावेश आहे. या पट्ट्यात आता पेरणीपश्चात मशागतीची आणि कोळपणीची कामे वेगाने सुरू आहेत.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर भात आवणीच्या कामांना मोठा वेग आला आहे. जिल्ह्यात भाताचे एकूण ९३ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ३४ हजार २९८ हेक्टरवर प्रत्यक्षात आवणी पूर्ण झाली आहे. पुढील काही दिवसांत आवणी पूर्ण होऊन संपूर्ण जिल्हा १०० टक्के पेरणीचा टप्पा गाठेल, असा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.