जायखेडा : प्रकाश शेवाळे
जगावं की मरावां, शेती करावी की सोडून द्यावी? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडत आहे. जूनमधील पावसाचा खंड, जुलैतील काही भागांतील अतिवृष्टी आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दिलेली ओढ यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, मूग तसेच भाजीपाला पिकांवर पाण्याचा ताण जाणवत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत उभी पिके कोमेजत असून, मका व बाजरीची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी मका कमी उंचीवरच तुरा काढत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही कधी अतिपावसाचा, तर आता पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे.
बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून, अनेक शेतकऱ्यांनी कर्जाच्या जोरावर पेरणी केली. मात्र, उत्पादनाची अनिश्चितता वाढल्याने कर्जफेडीची चिंता सतावत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राची तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ मूल्यांकन आणि मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
काही भागांत अतिपावसाने नुकसान झाले, तर आता पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके वाळत आहेत. त्यामुळे 'ओला दुष्काळ की, कोरडा दुष्काळ?' असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सप्टेंबरमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मोसम खोऱ्यात वारंवार खंडित व कमी दाबाचा वीजपुरवठा शेतीसाठी अडथळा ठरत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात अडचणी येत असल्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.
"पाऊस कमी असल्यामुळे पिकांवर ताण आहे. ओलाव्याचे व्यवस्थापन करून पिकांची काळजी घ्यावी. आवश्यक मार्गदर्शन केले जाईल."— किरणकुमार शिंदे व सागर अहिरे, कृषी अधिकारी
"अत्यल्प पावसामुळे कोरडवाहू व बागायती शेती संकटात आहे. शासनाने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."— दीपिका चव्हाण, माजी आमदार
"पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांसमोर संकट आहे. परिस्थितीवर लक्ष असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पाठपुरावा करू."— आमदार दिलीप बोरसे