जरागेंकडून फडणवीस, भुजबळांवर बाण; नारायण राणेंचा सन्मान file photo
नाशिक

जरांगेंचे फडणवीस, भुजबळांवर टीकेचे बाण ; नारायण राणेंचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'मराठा-कुणबी एकच असून, ओबीसीतूनच आरक्षण घेऊ', असा पुनर्उच्चार करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेचे बाण सोडणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी खासदार नारायण राणे यांच्याविषयी मात्र सन्मान असल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री फडणवीस मराठा-मराठ्यांमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान करीत असून, आमदार प्रवीण दरेकर सभा आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्याला खतपाणी घालत आहेत. मात्र, मी सयंमी आहे, त्यामुळे कोणीही अंत पाहू नये, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

शांतता रॅलीच्या समारोपप्रसंगी सीबीएस चौकात आयोजित जाहीर सभेत जरांगे-पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे मंत्री भुजबळ यांच्यावरील टीकेनेच आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी अत्यंत शेलक्या भाषेत भुजबळांवर टीका केली. भुजबळ म्हणतात की, किमान आठ जागा निवडून आणा, पण तुम्ही निवडून येताय का ते बघा. गेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातदेखील प्रचाराला बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे आता तरी हुशार व्हा. तुम्ही आतापर्यंत शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता देवेंद्र फडणवीस यांची भाजप फोडण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. मात्र, तरीदेखील यांना लक्षात येईना. तुम्ही माझ्या नादाला लागू नका, अन्यथा येवल्यात येऊन पराभूत करू असा सज्जड दमही त्यांनी दिला. फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, फडणवीस यांनी आतापर्यंत सगळ्यांना पाणी पाजले. मात्र मी त्यांना असा वस्ताद भेटलो की, आता त्यांना काहीच उमजेना. या दोघांनाही मी एकच सांगतो की, जो-जो मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात येइल, त्याचा कार्यक्रमच झाला म्हणून समजा असा इशाराही दिला.

मात्र, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वयाचा आपण सन्मान करायला हवा. त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्याविषयी कोणी काहीपण आणि कुठेही बोलू नये, असे आवाहन करताना आपण त्यांचा पहिल्यापासूनच सन्मान करीत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. नारायण राणे वयाने मोठे असून, ते अनुभवी आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा. फडणवीस यांचे एेकुण राणे यांनी देखील काही पण बोलू नये. ते म्हणाले की, मराठवाड्यात येवून बघून घेतो. पण मराठवाड्यात येण्याअगोदर त्यांना पश्चिम महाराष्ट्रातून यावे लागेल. तेथील मराठे मराठवाड्यासारखेच अवघड आहेत, त्याहीपेक्षाही नाशिकचे मराठे अवघड आहेत. त्यामुळे राणे यांनी देखील विचारपूर्वक बोलावे, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

विधानपरिषदेचेच आमदार टीका करतात

आमदार प्रविण दरेकर मराठा-मराठ्यांमध्ये भांडणे लावत आहेत. मराठ्यांच्या संघटना फोडत आहेत. आमचे समन्वयक त्यांनी फोडले. दरेकरांप्रमाणे इतरही काही मंडळी टीका करण्यासाठी पुढे येतात. पण, टीका करणारे सर्वच विधान परिषदेचे आमदार आहेत. निवडून आलेला एकही आमदार टीकेसाठी पुढे येत नाही, एखादा आलाच तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

मुंबईत धडकण्याचा इशारा

मुंबईत मराठे धडकल्यावर काय होते हे सरकारने बघितले आहे. मागच्या वेळेत आमचे मराठे मंत्रालयासमोर आंघोळ करीत होते. काहींनी तर हॉटेलसमोरच भात शिजवायला टाकला होता. एका पायऱ्या नसलेल्या इमारतीवर मराठे चढले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नवल वाटले होते. त्यामुळे मुंबईत काय होवू शकते, हे सरकारने बघितले आहे. मात्र, टीका करणाऱ्यांची संख्या जास्तच वाढू लागल्याने, त्यांची घरे बघायला मुंबईत जावे लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगेंनी थोपाटले दंड

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आलेल्या जरांगे-पाटील यांनी मराठ्यांची संख्या बघून दंड थोपाटले. तसेच आगामी विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करून पुढचे सरकार गोरगरिबांचेच असेल असे भाकीतही त्यांनी केले. यावेळी नाशिकच्या मराठ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

कमरेत वेदना, तरीही ५४ मिनिट भाषण

प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांनी १८ मिनिटेच भाषण करण्यास सांगितले असतानाही मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल ५४ मिनिटे भाषण केले. कमरेत वेदना होत असल्याने, त्यांनी कमरेला पट्टा बांधला होता. सुरुवातीचे दहा मिनिटे भाषण केल्यानंतर त्यांनी खुर्ची मागितली. मात्र, खुर्चिवर बसूनही वेदना होत असल्याने, त्यांनी उभे राहूनच भाषण केले. यावेळी त्यांनी भावनिक साद करताना, मला प्रचंड वेदना आहेत, मात्र मराठ्यांच्या आरक्षणासाठी मी अखेरपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. सभेनंतर ते आरवली सराटी येथे रुग्णालयात दाखल होणार असल्याचे त्यांनी सभेतच स्पष्ट केले.

कोणत्याही क्षणी मरण

स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या लेकरांना आणि जातीला वाचवा. माझ्यासाठी एक-एक क्षण महत्त्वाचा आहे. कोणत्याही क्षणी मला मरण येऊ शकेल. सर्वजन माझ्यावर टपून आहेत. सर्वांनी मला उघडे पाडण्याचे ठरविले आहे. पण मी स्वप्न घेऊन पुढे जात आहे. अंगात रक्त नाही. दाेन डाॅक्टर पूर्णवेळ माझ्यासोबत आहेत. त्यांचे शंभर खाटांचे रुग्णालये आहेत, मात्र ते रुग्णालये विसरले असून, आंदोलक झाले आहेत. तुम्ही एकजूट व्हा असे आवाहनही त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT