नाशिक

Jalna Silk Cocoon Market | जालन्याचा रेशीम धागा जगाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवा निर्धार

Jalna Silk Cocoon Market | मुख्यमंत्री फडणवीस : रेशीम कोष खरेदी केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

जालना : पुढारी वृत्तसेवा
कापूस आणि सोयाबीन या पारंपारिक नगदी पिकांना पर्याय म्हणून तुती व रेशीम शेतीला प्रोत्साहन देत जालन्याला रेशीम उद्योगाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्यातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र जालन्यात सुरू झाले असून, पहिल्याच लिलावात रेशीम कोषाची बोली ९६१ रुपयांपर्यंत पोहोचली.

रेशीम उत्पादनापासून कापडनिर्मिती आणि निर्यातीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी उभी करून जालन्याच्या रेशीम धाग्याने जगाला जोडण्याच्या दिशेने वाटचाल करू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


राज्यात प्रथमच जालना येथे सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, जालन्यात रेशीम उद्योगाची मोठी क्षमता आहे.

सिल्क, सीड आणि स्टीलमुळे जालन्याची 'ट्रिपल एस सिटी' अशी ओळख आहे. रेशीम कोषापासून धागा, कापड आणि तयार वस्त्रांपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
अंबड येथील निजामकालीन पोलिस ठाण्याच्या जागी आता आधुनिक भारताकालीन पोलिस ठाणे कार्यान्वित झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावाच्या निमित्ताने हे पोलिस ठाणे मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिस विभागाचे अभिनंदन केले.

गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत वेगाने निर्णय घेतले जात असल्याचे सांगताना, एका चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केवळ ५३ दिवसांत शिक्षा झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. २० दिवसांत चार्जशीट दाखल करणे आणि ३३ दिवसांत पुढील कारवाई पूर्ण करणे हे पोलिस विभाग आणि अभियोग पक्षाच्या प्रभावी कामगिरीचे द्योतक आहे, असे फडणवीस म्हणाले.

'जालनाई' ब्रँड मिळवून देण्याची संधी

नाशिक, पैठण आणि येवला परिसरात पैठणीचे क्लस्टर विकसित झाले आहेत. त्याच धर्तीवर जालन्यात रेशीम वस्त्रनिर्मितीचे क्लस्टर उभारता येईल. जालन्यातील रेशीम उत्पादनाला स्वतंत्र 'जालनाई' ब्रँड मिळवून देण्याची संधी आहे. भारताने पूर्वी जगाला रेशीम पुरवठा केला आहे. आता पुन्हा त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. त्यासाठी उत्पादन वाढविण्यासोबतच कौशल्य विकास, बाजारपेठ आणि मूल्यवर्धनावर भर देण्यात येईल. या व्यवस्थेचा अधिकाधिक लाभ रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT