जायखेडा : प्रकाश शेवाळे
बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आखतवाडे गावातील बिजोटे शिवारात असलेल्या सुमारे ४० ते ५० वर्षे जुन्या 'इंजिरा' पाझर तलावाचा बंधारा फुटल्यामुळे परिसरातील ५ ते १० हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे उभी पिके, सुपीक माती तसेच शेतीची उत्पादकता बाधित झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
सोमवारी (दि. ३) झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. वाढलेल्या पाण्याचा दाब सहन न झाल्यामुळे बंधारा अचानक फुटला. त्यानंतर आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाने शेतांमध्ये घुसून मका, बाजरी, कोथिंबीर व वाल या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत प्रवीण ह्याळीज, भाऊसाहेब गोयेकर, लक्ष्मण गोयेकर, बबन ह्याळीज, वसंत ह्याळीज, ताराबाई वानू गोयेकर, सुमनबाई गोयेकर, लताबाई ह्याळीज, प्रकाश ह्याळीज, योगेश पांडुळे व अक्काबाई पांडुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
भाऊसाहेब गोयेकर यांच्या शेतात पुराच्या पाण्याबरोबर तब्बल ७० ते ८० ट्रॉली माती व गाळ साचल्याने उभी पिके गाडली गेली असून, अनेक ठिकाणी सुपीक जमीनही निकामी होण्याच्या स्थितीत आली आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेतीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी सहायक अधिकारी योगेश बोरसे व तलाठी कविता पठारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असून, शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी 'इंजिरा' पाझर तलाव बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
४० ते ५० वर्षे जुना पाझर तलाव
कृषी सहायक अधिकारी योगेश बोरसे यांनी सांगितले की, 'इंजिरा' पाझर तलाव सुमारे ४० ते ५० वर्षे जुना असून, त्याचा बंधारा अतिवृष्टीमुळे फुटला आहे. नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून, शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी व आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने काही मिनिटांत शेती उद्ध्वस्त झाली. सुपीक माती वाहून गेली. प्रशासनाने मदत करून बंधारा मजबूत करावा.
- भाऊसाहेब गोयकर, शेतकरी, आखतवाडे