देवळाली कॅम्प (नाशिक) : तिकिटांचे हस्तांतरण, दलालांकडून होणारे गैरप्रकार, बनावट ओळखपत्रे आणि बनावट तिकिटांवर प्रवास यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे दक्षता पथकाने जानेवारी २०२५ ते मे २०२५ दरम्यान विशेष मोहिम राबवली.
या अंतर्गत सुमारे नऊ दलालांना अटक करत गैरप्रकारांना आळा घातल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली. मध्य रेल्वेच्या या कारवाईनुसार फेब्रुवारी २०२५ मध्ये अंबरनाथ रेल्वे स्थानकात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बेकायदेशीर ई-तिकीट विक्री उघडकीस आली असून १२ हजार रुपयांची तिकिटे आणि १३ आयडी जप्त करण्यात आले. कोल्हापूरात चार तिकीट दलालांना २५ हजार रुपयांच्या तिकीटांसह अटक करण्यात आली. मार्चमध्ये पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे तीन तिकीट दलालांना अटक करत १० हजार रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली. तसेच संगणक प्रणणीलाचा गैरवापर करत रिझर्वेशन क्लर्कने वैयक्तिक फायद्यासाठी तिकीट प्रिंट न करता सिस्टममध्ये जारी केल्याने त्याच्याविरोधात आरोपपत्र जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये दोन प्रवाशांना खोट्या ओळखपत्र आणि हस्तांतरित तिकीटांसह प्रवास करताना आढळल्याने दोघांनाही दंड करण्यात आला. मलकापुरात दोन व्यक्तींना सुमारे दहा लाखांच्या १८२ तिकीटांसह अटक करण्यात आली. दलाल, रिझर्वेशन क्लर्क आणि रेल्वे सुरक्षा दल निरिक्षक यांच्यात साखळी आढळली असून तिघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
नाशिक : राहुल धोत्रे हत्याकांडातील आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसेचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात जामीनावर होणारी सुनावणी ही पुढे ढकलली आहे. न्यायाधीशांकडे अतिरिक्त काम असल्यामुळे सदर प्रकरण पुढे ढकलण्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे नव्याने सुनावणी होईपर्यंत निमसेस कारागृहातच राहावे लागणार आहे
१६ सप्टेंबर पासून कारागृहात बंदिस्त आहे. २३ ऑगस्ट रोजी नांदूर नाका येथे दोन गटांमध्ये किरकोळ भांडणाचे रूपांतर गंभीर हाणामारी झाली.राहुल धोत्रे या तरुणाचा खून झाला.जेव्हा हे भांडण सुरू होते तेव्हा उद्धव निमसे व त्यांचे कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्हींचे हे फरार होते. मात्र सत्र न्यायालय व हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पोलीस विभागाला शरण आले.या घटनेच्या पोलीस तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्याकडे दिलेला आहे.
कळवण (नाशिक) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर कळवण पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवार (दि. ११) संशयित १४ दंगेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी सकाळी त्यांची शहरात धिंड काढण्यात आली.
शेतमजुर तरुण बेपत्ता झाला असून त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता बेपत्ता झालेला शेतमजुर त्याच्या घरातच मिळून आला होता. त्यामुळे या प्रकरणी आता पोलिसांनी संशयित दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईमध्ये संशयित बाळू लक्ष्मण माळी (रा. कळवण खुर्द), बापू सुभाष जाधव (रा. मानूर), विकास रामदास सोनवणे, सचिन भाऊसाहेब वाघ, गणेश भास्कर सूर्यवंशी, करण भावसिंग पवार, सचिन शांताराम पवार (सर्व रा. पाळे खुर्द), सागर अशोक शिंदे (रा. मानूर), नितीन बबन बागुल (रा. रवळजी), कृष्णा सुकदेव पवार, सुनील प्रकाश जाधव, योगेश अरुण जाधव, सागर भिवराज जाधव, कैलास विठोबा सोनवणे (सर्व रा. जिरवाडे) यांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी तसेच कळवण पोलिस ठाण्याचे निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, मोबाइल लोकेशनवर पोलिसांची तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंग्यामध्ये सहभागी असलेल्या काही मुख्य संशयितांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे.