नाशिक : आसिफ सय्यद
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमतासह, राज्यातील तीन वरिष्ठ मंत्री नाशिकमध्ये तळ ठोकून असताना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असताना अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला.
भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले. पहिल्या दृष्टिक्षेपात हा निकाल महायुतीच्या अंतर्गत बंडखोरीचा विजय आणि शिंदे सेनेच्या पराभवाचा धक्का वाटत होता. मात्र, काही तासांतच घडलेल्या घटनांनी या संपूर्ण राजकीय कथेला नवे वळण मळाले आहे. विजयानंतर गोकुळ गिते मुंबईला गेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले.
एका क्षणात संपूर्ण राजकीय विश्लेषण बदलले. ज्यांच्या विजयाला महायुतीविरोधी मतांचा विजय म्हटले जात होते, तेच गिते सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात दाखल झाले. नाशिकमधील महायुतीतल्या वर्चस्ववादाच्या लढाईत दराडे निवडणूक हरले तरी एकनाथ शिंदे मात्र जिंकले. राजकारणात अनेकदा निकाल हा अंतिम सत्य नसतो; तर निकालानंतरची राजकीय मांडणी हेच खरे सत्य असते. नाशिकमध्ये नेमके तेच घडले.
या संपूर्ण संघर्षाची सुरुवात जागावाटपापासून झाली. नाशिकची जागा भाजपच्या वाट्याला जाईल, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. गणेश गिते हे इच्छुक उमेदवार होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली. त्यानंतर नरेंद्र दराडे यांची उमेदवारी निश्चित झाली. याच क्षणी स्थानिक पातळीवर नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
भाजपमध्ये अस्वस्थता होतीच; पण शिवसेनेतही दराडे यांच्या उमेदवारीबद्दल सर्वत्र समाधान नव्हते. दराडे यांची उमेदवारी ही निव्वळ निवडणुकीची उमेदवारी नव्हती. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्याला दिलेले राजकीय बक्षीस अशी तिची प्रतिमा निर्माण झाली. ही प्रतिमा बदलण्यात पक्षाला यश आले नाही.
परिणामी, स्थानिक पातळीवर विरोध वाढत गेला. गोकुळ गिते यांच्या बंडखोरीने या विरोधाला चेहरा मिळाला. सुरुवातीला त्यांना केवळ दबावतंत्राचा भाग मानले जात होते. मात्र नंतर ते स्वतंत्र राजकीय केंद्रबिंदू बनले. गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनी त्यांची मनधरणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही स्तरावर चर्चा झाल्या.
गिते यांनी प्रचार थांबविल्याची घोषणा केली; पण निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यांचे नाव मतपत्रिकेवर राहिले आणि अखेरीस तेच निर्णायक ठरले. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या वेळी एक गोष्ट स्पष्ट दिसली, महायुतीचे सर्व मतदार अधिकृत उमेदवारासोबत नव्हते. महाविकास आघाडीने उमेदवार दिला नसला तरी त्यांची मते कुठे जाणार याची उत्सुकता होती.
शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, शरद पवार गट, मालेगावातील इस्लाम पार्टी आणि इतर विरोधी घटकांनी गिते यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा संपूर्ण निवडणुकीत होती. परिणामी गिते हे बंडखोर नाहीत; ते महायुतीविरोधी मतदानाचे केंद्र बनले. मात्र निकालानंतर घडलेली घटना अधिक महत्त्वाची ठरली. गोकुळ गिते यांच्या विजयाबद्दल एकनाथ शिंदे यांनी तातडीने संपर्क साधल्याचे वृत्त आले. त्यानंतर गिते यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यासाठी उदय सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामंत यांनीच गिते बंधूंना नाशिकमधून विशेष विमानाने मुंबईत नेले. यामुळे नाशिकच्या निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले. ज्यांना महायुतीतील बंडखोर मानले जात होते, ते आता महायुतीचाच भाग बनले आहेत. विधान परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे नुकसान झाले नाही. उलट शिंदे गटाने विरोधकांच्या मदतीने निवडून आलेल्या सदस्यालाही आपल्या गोटात आणले. त्यामुळे हा पराभव