सुरगाणा : आदिवासी समाजाच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे असून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत सामान्य वाडी वस्तीतून आलेला मी गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच निवडणूक संपली की लाडकी बहीण योजना बंद होईल, असा अपप्रचार विरोधक करत असून मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. फसवेगिरी करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले. सुरगाणा येथे शुक्रवारी (दि.२) केले. ९१९ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, कधी सरकारमध्ये तर कधी विरोध पक्षनेता म्हणून मी काम असून कळवण सुरगाणा मतदारसंघात बावीस कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करून दिला आहे. आमदार हा विकासासाठी असला पाहिजे. लाडकी बहिण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. हे कदापि होणार नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. गैरसमज व फसवेगिरी करणार नाही. गोर-गरीबांना मदत करुन विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. लाडकी बहिण योजना ही अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून कोणत्याही जाती धर्माची अट या योजनेत नाही. मोलमजुरी, धुणे भांडी करणा-या, कचरा गोळा करून उदरनिर्वाह करण्या-या महिलांना ताठ मानेने समाजात जगता यावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार सांगितले.
यावेळी विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी, दहावी, बारावी तरुणांना स्टायपेंड, तीन गॅस सिलेंडर मोफत, आठ लाखाहून कमी उत्पन्न धारक मुलींना मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान, आशा , अंगणवाडी यांच्या मानधनात भरीव वाढ, शबरी घरकुल योजना आदी योजनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार दिलीप काका बनकर, सरोजताई अहिरे, राजेंद्र उफाडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.