नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी, दारणा, गिरणा या प्रमुख नद्यांसह जिल्ह्यातील विविध नदी, नाले-ओढ्यांच्या जलपातळीत पुन्हा वाढ होत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गत सोमवारपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत असून, गुरुवारी रात्री गोदावरीला महापूर आल्याने नाशिक शहर पूर्णपणे जलमय झाले होते. त्यानंतर नदीकाठचा परिसर सावरात असताना रविवारी (दि. २६) पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांसह भांडीबाजार व सराफ बाजारातील व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
गंगापूर धरणातून गुरुवारी उच्चांकी विसर्ग केल्यानंतर हळूहळू कमी करून ४४१० क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. मात्र, रविवारी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास विसर्गात ५३७ क्यूसेकने वाढ करून ४९४७ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गोदावरीला पुन्हा पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दारणा धरणातूनही विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेला मुकणे धरणातही ६० टक्क्यांहून अधिक भरल्याने येत्या काही तासांत मुकणे धरणातूनही विसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत गंगापूर, दारणा, मुकणे, वालदेवी धरणांतून एकाचवेळी विसर्ग वाढल्यास नांदूरमध्यमेश्वरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागणार असल्याने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मालेगाव : १.५ मिमी
बागलाण : ४.४ मिमी
कलवण : १०.४ मिमी
नांदगाव : ३.४ मिमी
सुरगाणा : ३५.९ मिमी
नाशिक : ८.९ मिमी
दिंडोरी : १७.९ मिमी
इगतपुरी : ११.४ मिमी
पेठ : २१.१ मिमी
निफाड : ११.५ मिमी
सिन्नर : १.१ मिमी
येवला : ३.२ मिमी
चांदवड : १२ मिमी
त्र्यंबकेश्वर : ६४ मिमी
देवळा : १.५ मिमी
गोदावरीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेलेली काही मंदिरे अजूनही पाण्याखालीच असून, दशक्रिया विधीसह रामकुंड आणि गोदाकाठावरील विविध धार्मिक विधींसाठी अजूनही भाविकांना गोदाकाठापासून दूरच राहावे लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांनंतर शनिवारी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने भाविकांना गोदावारी काठावरील मंदिरे खुली होण्याची अपेक्षा होती. मात्र, रविवारी पावसाचा जोर वाढल्याने या सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच विविध धार्मिक विधींसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कलवण तालुक्यातील चणकापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असून, पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्हाभरातील धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असतानाही रविवारी (दि. २६) सायंकाळी ४ च्या सुमारास १२,१७५ क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.