काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  Pudhari File Photo
नाशिक

Harshvardhan Sapkal | 'भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणून मिळाले पालकमंत्रिपद'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

Harshvardhan Sapkal | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ : कुंभमेळ्यातील घोटाळ्यावरून सरकारवर घणाघात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेले मोठे गौडबंगाल आता उघडे पडले आहे. पालकमंत्र्यांच्या नातेवाइकाने केलेल्या भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणूनच त्यांना पालकमंत्रिपद बहाल करण्यात आले आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. नाशिक शहर आणि कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या 'संघटन सृजन अभियाना'अंतर्गत नाशिकमध्ये राज्यातील जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे सोमवारी (दि. २४) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. सपकाळ म्हणाले की, कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर न्यायाधीशांनीसुद्धा अत्यंत गंभीर टिप्पणी केली आहे.

कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारातील अवघा एक टक्का निधी जरी शिक्षणासाठी दिला, तरी राज्यातील हजारो शाळा वाचू शकतील, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधत ते पुढे म्हणाले, मंत्री महाजन यांनी या सर्व भ्रष्टाचारावरून पळवाट शोधू नये.

नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या पापांचे त्यांनी तात्काळ प्रायश्चित्त करायला हवे. कुंभमेळ्यातील निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय मनमानीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. कोचिंग क्लासेससाठी नवीन मसुदा यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, नवीन मसुदा आणण्यापेक्षा मूळ आजारावर उपचार करणे गरजेचे आहे.

'नीट' पेपरमधील घोटाळे, तलाठी आणि ग्रामसेवक भरतीचे पेपर फुटणे हा खरा आजार आहे. सरकार आजार सोडून भलताच उपचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस माजी मंत्री थोरात, अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिस्ती, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मोहन जोशी, शरद आहेर आदी उपस्थित होते.

मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान

एसआयआरवर बोलताना सपकाळ म्हणाले की, एसआयआर मुदतवाढीची अत्यंत गरज आहे. हैदराबाद हाऊस येथे बीएलओंकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली जात असून, अन्यायकारक काम सुरू आहे. सर्व काही मुख्यमंत्रीच करत आहेत का? शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान थेट संघाच्या कार्यालयातून रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर सडकून टीका करताना सपकाळ म्हणाले, मोदींनी कोणते वचन पूर्ण केले? दोन कोटी रोजगार, स्वामिनाथन आयोग, १०० स्मार्ट सिटी, महिला सुरक्षा आणि रुपयाचे मूल्य कुठे गेले? खाणे चालू आहे आणि खाऊ दिले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी का घाबरत आहेत? मोदी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. पुलवामा हल्ल्यातील आरोपी कोण होते, हे आधी स्पष्ट करावे. देशाची ही अधोगती का होत आहे, याचा रिपोर्ट कार्ड सरकारने काढून दाखवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT